मुंबई – राष्ट्रात राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव शरद पवार यांनी मांडला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यामुळे राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसची मते फुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जर उमेदवार निवडून आणायचा असेल तर छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी द्यावी, असा शरद पवार यांचा प्रयत्न आहे.
छत्रपती शाहू महाराजांना रिंगणात उतरवल्यास विजयश्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा शरद पवार यांचा मास्टरस्ट्रोक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यसभा निवडणुकीत गेल्या वेळी देखील काही मते फुटली होती.
या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धती असल्याने यावेळी महाविकास आघाडीला कोणताही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे कोणीही विरोध करू शकणार नाही, असा उमेदवार देण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे. या संदर्भात शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची लवकरच बैठक देखील होणार आहे.
आगामी राज्यसभा निवडणुकीतील एकूण सहा जागांपैकी चार जागा या सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळणार आहेत. यामध्ये भाजपला तीन, शिंदे गटाला एक तर अजित पवार गटाला एक जागा मिळेल.
महाविकास आघाडीचा देखील एक उमेदवार सहज विजय होईल. मात्र सहाव्या जागेसाठी मतांची गोळा बेरीज करावी लागणार आहे. या जागी भाजप आपला चौथा उमेदवार देण्याची शक्यता आहे.