नवी दिल्ली – मोदी सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबून टाकत आहे. या सरकारने गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांसाठी बरीच मोठी आश्वासने दिली होती पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या तोंडाला पानेच पुसण्याचे काम या सरकारने केले आहे अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काटेरी तार, ड्रोनमधून अश्रुधुराचा मारा, खिळे आणि बंदुका असा सर्वकाही बंदोबस्त शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केला गेला आहे असे खर्गे यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. आंदोलनजीवी’ आणि ‘परजीवी’ म्हणून शेतकऱ्याची कशी बदनामी करण्यात आली हे लक्षात ठेवा आणि मागच्या आंदोलनात ७५० शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला,ही बाबही ध्यानात ठेवावी लागेल असे त्यांनी म्हटले आहे.
मोदी सरकार २०२२ सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चात ५० टक्के अधिकची भर पडणार होती, किमान हमी भावाला कायदेशीर दर्जा दिला जाणार होता पण यातले काही एक झाले नाही.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देत खर्गे म्हणाले की, काँग्रेस आज छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आवाज उठवेल.आम्ही घाबरणार नाही, आणि झुकणारही नाही, असे खर्गे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.