करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या प्राणघातक विषाणूची चैन तोडण्यासाठी सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन आता आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने दारू आणि पानाची दुकाने सुरु करण्याची सशर्त संमती दिली आहे. याबाबत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात दारुची दुकानं सुरू ठेवली तर त्याचे विनाशकारी परिणाम भोगावे लागतील. दारुमुळे कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणं वाढली आहेत. लहान मुलं आणि महिलांसाठी हा निर्णय त्रासदायक ठरु शकतो, अशा आशयाचे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही जावेद अख्तर यांनी इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून बोलताना करोनाचा प्रादुर्भाव होण्यास संपूर्ण मुस्लिम बांधवांना लक्ष करण्यात येत असल्याने खडेबोल सुनाविले होते. तसेच प्रत्येक देश स्वतःला महासत्ता बनवण्याच्या नादात स्वतःच्या देशातील आरोग्यव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे, असे सांगत भविष्यात आपल्या देशाला अशा आपत्तींसाठी आधीपासूनच तयारी करायला हवी, असा सल्लाही दिला होता.