जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. त्यानंतर गावोगावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी ग्रामदक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना बंदी घालून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार या समित्यांना देण्यात आले आहेत.
मात्र, सोनके येथील ग्रामदक्षता समितीने या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. बाहेरून आलेल्या लोकांची माहिती या समितीने संकलित केली नाही. कोणावरही फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर बाहेरगावाहून आलेल्या एक व्यक्ती करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी समितीला नोटीस बजावली आहे.
सोनके गावचे सरपंच, तलाठी, आरोग्यसेवक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सोसायटीचे सचिव, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटाच्या सचिव, महिला बचत गट ग्रामसंघ अध्यक्ष, पोलीस पाटील यांना ही नोटीस बजावली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आपणावर गुन्हा का दाखल करू नये, अशी विचारणा नोटिशीद्वारे करण्यात आली आहे.याबाबत दोन दिवसात खुलासा सादर करण्याचा आदेशही नालावडे यांनी दिला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत समितीने हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.