नवी दिल्ली – देशातील बहुतांश शहरे ही पारंपारिक शहरे आहेत, जी पारंपारिक पद्धतीने विकसित झाली आहेत. आधुनिकीकरणाच्या या युगात या शहरांचा पुरातन वारसाही तितकाच महत्त्वाचा आहे. ही शहरे आपल्याला वारसा आणि स्थानिक कौशल्ये कशी जपायची हे शिकवू शकतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच विद्यमान वास्तू नष्ट करणे हा मार्ग नसून पुनरुज्जीवन आणि जतन करण्यावर भर द्यायला हवा असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अखिल भारतीय महापौर परिषदेचे उद्घाटन केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग उपस्थित होते.
नरेंद्र मोदी म्हणाले, सरदार पटेल अहमदाबादचे महापौर होते आणि देश आजही त्यांचे स्मरण करतो. महापौर पद हे अर्थपूर्ण राजकीय कारकीर्दीसाठी एक महत्वपूर्ण पायरी ठरू शकते, जिथे तुम्ही या देशातील लोकांची सेवा करू शकता, असेही पंतप्रधान म्हणाले.
आपली शहरे ही आपल्या अर्थव्यवस्थेची प्रेरक शक्ती आहेत. आपण शहरांना चैतन्यदायी अर्थव्यवस्थेचे केंद्र बनवले पाहिजे. आर्थिक उलाढालींना आमंत्रण देणारी आणि प्रोत्साहन देणारी परिसंस्था निर्माण करण्यासाठी सर्व सुविधा एकाच वेळी विकसित होणारी सर्वांगीण व्यवस्था तयार करावी, असे त्यांनी सांगितले.
महापौरांनी शहरांचे वाढदिवस शोधून साजरे करावेत. तसेच नद्या असलेल्या शहरांनी नदी उत्सव साजरा केला पाहिजे. नद्या शहरी जीवनाच्या पुन्हा केंद्रस्थानी आणल्या पाहिजेत. यामुळे आपल्या शहरांना नवसंजीवनी मिळेल. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक निर्मूलनाच्या विरोधातील मोहिमेला पुनरुज्जीवित करण्याचे आवाहनही त्यांनी महापौरांना केले.