सातारा – विदर्भामध्ये तापमान 45 अंश सेल्सिअस असतानाही, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. विदर्भातील रामटेक, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली आदी दहा मतदारसंघांमध्ये मी फिरलो आहे. तेथील लोकांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार केला आहे. सातार्याची जनताही उदयनराजेंनाच विजयी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्रात काही सर्व्हे पुढे येत असून, महायुतीला कमी जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मागच्या वेळी सर्व्हेमध्ये असेच अंदाज व्यक्त करण्यात आले होते. प्रत्यक्षात तसे झाले नाही.
त्यावेळी महायुतीला 43 जागा जागा मिळाल्या होत्या. ज्यांना कामधंदा नाही, ते लोक आमच्यावर आरोप करत आहेत. महाविकास आघाडीकडे काही काम उरलेले नाही, म्हणून ते आरोप करत आहेत. आमच्या सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेली कामे लोकांसमोर आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण अशा सर्वांसाठी आम्ही काम केले आहे. गेल्या अनेक वर्षांत न झालेली कामे आम्ही दोन वर्षांत केली आहेत. काँग्रेसला 50- 60 वर्षांत जे जमले नाही, ते मोदी सरकारने दहा वर्षांत केले आहेत. लोक आश्वासने देतात, पण, ती पाळत नाहीत. मोदींनी असे कधीही केलेले नाही. पुढील पाच वर्षे 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात शेतकरी, गरीब, युवा, महिलांना प्राधान्य देण्यात आले आहेत. गरिबांना रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे.
देशात मोदींची लाट निर्माण झाली आहे. पंतप्रधान कोण, असा प्रश्न विचारला, तर प्रत्येक जण ‘मोदी मोदी’ म्हणतो. कारण, राहुल गांधी यांचे वय 52-54 वर्षे झाले, तरी त्यांना मॅच्युरिटी येत नाही, हे काँग्रेसच म्हणत आहे. त्यांचे लाँचिंग अजूनही यशस्वी झालेले नाही. राज्यात यावेळी महायुती ‘45 पार’ असेल. लोकांच्या भावना महायुतीच्या बाजूने आहेत. घरी बसणार्यांना, फेसबूक लाइव्ह करणार्यांना मतदान करणार की, ‘फेस टू फेस’ भेटणार्यांना मतदान करणार? आमचे सरकार फिल्डवर काम करणार आहे.
लोकांशी संवाद साधणारे, शेतकर्यांच्या बांधांवर जाणारे सरकार आहे. आम्ही शेतकर्यांना आजपर्यंत 45 हजार कोटी रुपये दिले आहेत. इतिहासात इतके पैसे शेतकर्यांना कधीच मिळाले नाहीत. केंद्र आणि राज्याने प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकर्यांना दिले आहेत. त्याची पोचपावती लोकसभा निवडणुकीत जनता दिल्याशिवाय राहणार नाही. सातारा लोकसभा मतदारसंघात आमच्याकडे चार तगडे आमदार आहेत. रॅलीतील जनसमुदाय तुम्ही पाहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी सातार्याची जनता महायुतीचे उमेदवार उदयनराजे यांना विजयी करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.