अमृतसर – विश्वनाथ धाम कॉरिडोरच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या “श्री काशी विश्वनाथ धाम का गौरवशाली इतिहास’ या पुस्तिकेचा तीव्र निषेध करीत या पुस्तकावर तातडीने बंदी आणण्याची मागणी शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीने केली आहे.
समितीचे माध्यम सचिव कुलविंदरसिंग रामदास यांनी याबाबत निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. त्यात रामदास म्हणतात, विश्वनाथ धाम कॉरिडोरच्या उद्घाटन समारंभात “श्री काशी विश्वनाथ धाम का गौरवशाली इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाला मोठ्या प्रमाणात वाटप प्रसाद म्हणून उत्तर प्रदेश सरकारने केले. त्यात शिख समाजाच्या श्रध्दास्थानांचा चुकीचा इतिहास मांडण्यात आला आहे. त्याचा संबंध काशीशी जोडण्यात आला आहे.
गुरू गोविंदसिंह (दहावे गुरू) यांनी खालसा पंथ स्थापन करण्यात आल्यानंतर पंच प्यारेना प्रथम काशीला पाठवले. त्यामुळे त्यांना सनातन धर्माची सखोल माहिती झाली आणि ते त्यांच्या संरक्षणासाठी सज्ज झाले. शिख धर्माची स्थापना सनातन धर्माचे मुघलांपासून संरक्षण करण्यासाठी झाली, असेही या पुस्तकात म्हटले आहे. या दोन्ही बाबी सत्याचा अपलाप करणाऱ्या आहेत. शिख धर्मगुरूंच्या ध्येय्याबाबत असणाऱ्या अज्ञान दर्शवणारी आहेत, असे रामदास म्हणाले.
ते म्हणाले, खालसा पंथाची स्थापना अन्याय आणि अत्याचारापासून धार्मिक मुल्य आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी झाली आहे. काशीला पाठवण्यात आलेले संत हे खालसा स्थापनेच्या वेळी आनंदपूर साहेब येथे आपले मस्तक अर्पण करणाऱ्या पंच प्यारेपेक्षा वेगळे होते, असे रामदास यांनी स्पष्ट केले.