पणजी – कॉंग्रेस नेत्यांचा भर फुल टाईम नव्हे; तर पार्ट-टाईम राजकारणावर आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे रूपांतर आता पार्ट-टाईम पक्षात झाले आहे. त्यातून तो पक्ष देशातून हळूहळू नाहीसा होऊ लागला आहे, अशी खिल्ली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उडवली.
भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी असणारे फडणवीस येथे एका मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. आता तृणमूल कॉंग्रेसच स्वत:ला खरा कॉंग्रेस पक्ष म्हणत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झालेल्या तृणमूल आणि आपलाही फडणवीस यांनी लक्ष्य केले. पश्चिम बंगाल आणि दिल्लीतील पक्ष केवळ प्रयोगासाठी गोव्यात आले आहेत.
निवडणूक हरल्यानंतर ते गायब होतील. तृणमूलचा कारभार चांगला असेल; तर बंगालची स्थिती एवढी वाईट का? त्या राज्यात गुंतवणूकदार जात नाहीत. दिल्लीतील सत्तारूढ पक्ष (आप) केवळ ट्रेलर दाखवतो; पिक्चर नाही. कुठल्याही पिक्चरचा ट्रेलर हिट होतो. मात्र, पिक्चर पाहिल्यावर भ्रमनिरास होतो, अशी शाब्दिक टोलेबाजी त्यांनी केली.