मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. शनिवारी राज्यात कोरोनाचे नवे ९२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ६६६ वर पोहचला आहे. शनिवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मुंबईत सर्वाधिक ७२, पुणे १, औरंगाबाद २, मालेगाव – ५, पनवेल -२, कल्याण-डोंबिवली १, ठाणे – ४, पालघर -१, नाशिक-२, अहमदनगर १ आणि वसई-विरारमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे.
92 more #COVID19 positive cases reported in Maharashtra today, taking the total number of positive coronavirus cases in the state to 1,666: Maharashtra Health Department pic.twitter.com/LJMrIxjw1F
— ANI (@ANI) April 11, 2020
राज्यात काल २१० नव्या कोरोनाबाधित रुग्णाची वाढ झाली होती. तर,काल एका दिवसात सर्वाधिक कोरोनाबाधित १३२ रुग्ण सापडले होते. तर शनिवारी ७२ नवे कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत सापडले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीत शुक्रवारी २८ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकारची चिंता वाढली असून, नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही घराबाहेर पडू नये असं अवाहन वारंवार करण्यात येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० एप्रिल पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.