नवी दिल्ली – करोनाच्या धोक्यामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सरावही करू शकत नसल्याने जेव्हा सर्व परिस्थिती सुरळीत होईल तेव्हा वेगवान गोलंदाजांसमोर अव्वल कामगिरी करण्याचे आव्हान असेल, अशी भीती माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने व्यक्त केली आहे.
खेळाडूंना मिळालेली विश्रांती लाभदायक ठरत आहे, कारण गेल्या मोसमापासून त्यांनी सातत्याने सामने खेळलेले आहेत. मात्र, लॉकडाऊन संपल्यावर जेव्हा प्रत्यक्ष सामन्यात गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतील तेव्हा त्यांना टप्पा, दिशा व अचूकता राखताना खूपच दडपण राहील. इतक्या मोठ्या विश्रांतीनंतर नव्याने सरस कामगिरी करणे अनेकांना शक्य होत नाही. गेल्या वर्षीपासून भारतीय गोलंदाजांनी अत्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी असून आपल्या गोलंदाजीच्या भेदकतेत सातत्य तर राखावेच लागेल. मात्र, त्याचवेळी आपल्या तंदुरुस्तीबाबतही कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे, असेही नेहराने स्पष्ट केले.
वेगवान गोलंदाजी करताना धावण्याचा केलेला सराव खूपच महत्त्वाचा ठरतो. तसेच विश्रांतीनंतर मैदानावर परतताना हाताची मुक्त हालचाल, शरीराची लवचिकता तसेच गोलंदाजी करतानाचे लॅण्डिंग व चेंडूचे रिलीज यात सातत्य राखणे हेच मोठे कठीण असते. 14 एप्रिलला लॉकडाऊन संपल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाल्यावर सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाल्यावर संघातील गोलंदाजांना लय मिळविणे तसेच योग्य टप्पा राखून गोलंदाजी करणे अवघड जाणार आहे, अशी भीतीही नेहराने व्यक्त केली.
सध्या खेळाडू घरीच आहेत. त्यांनी अगदी 20 फूट जागा मिळाली तरी तिथे गोलंदाजीचा सराव आणि शॅडोप्रॅक्टिस करणे चांगला पर्याय ठरू शकतो. घराच्या टेरेसवरही हा सराव करता येईल. अशा सरावाने शारीरिक हालचाल सुरू होते, त्यात सातत्य राखले तर नेटमध्ये सराव करणे सोपे होईल. मी स्वतः तंदुरुस्तीसाठी सराव करत होतो, त्यावेळी मी अशाच पद्धतीने सराव केला व त्याचा मला खूप फायदा झाला, असेही नेहराने सांगितले