पुणे – शहरात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने महापालिकेने शहरात गेल्या सहा महिन्यांत केलेल्या कामांचा दावा खोटा पाडला आहे. मागील वर्षी पावसाळ्यात शहरात जवळपास 200 ते 250 ठिकाणी पाणी तुंबले होते. त्यानंतर, महापालिकेने गेले वर्षभर पाणी तुंबणार यासाठी उपाय योजना म्हणून या ठिकाणी लाखोंचा खर्च केला. मात्र, हा खर्च आणि यंदा पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही, या महापालिकेने केलेला दाव्यावर पावसाने पाणी फेरले आहे.
शहरात बुधवारी (दि.15) अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक रस्ता, हिराबाग चौक, लाल महालपासून पुढे शिवाजी रस्त्याचा भाग, टिळक चौक डेक्कन जिमखाना भागात पाणी जमा झाले होते. तर उपनगरांमध्येही अनेक रस्त्यांवर पाणी वाहून जाण्यास जागाच नसल्याचे काही वेळ पाण्याची तळी साचली होती.
असाच प्रकार सलग दुसऱ्या दिवशी गुरूवारी आणि शुक्रवारी सायंकाळी हे पहायला मिळाला, या पावसानेही अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पहायला मिळाले. त्यात प्रामुख्याने कोथरूड कचरा डेपोसमोरील पौड रस्ता, शनिवार पेठेतील अमृतेश्वर मंदिर येथेही पाणी साचल्याचे पहायला मिळाले. उपनगरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवरही पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत.