सहस्रकातील कवयित्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच निबंध व कादंबरी लेखिका अमृता प्रीतम यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधील गुजरानवाला या गावात 31 ऑगस्ट 1919 रोजी झाला. कवी असलेल्या त्यांच्या पित्याने “पीयूष’ या शब्दाचा पंजाबीत अनुवाद करून त्यांचे नाव “अमृता’ ठेवले. त्यांचे पिता “पीयूष’ या टोपण नावाने काव्यरचना करीत असत. त्यांचा साहित्याचा वारसा त्यांच्या लेकीकडे आला. त्यांच्या आईचे त्या लहान असतानाच निधन झाले. लहानपणापासूनच त्यांची कवितेकडे ओढ होती.
अमृता यांचा विवाह प्रीतम सिंह यांच्याबरोबर झाला होता. त्यांचा केवळ वयाच्या सोळाव्या वर्षी “अमृत लहरे’ हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला.अमृता शायरीसुद्धा करीत असत. 1944 मध्ये एका मुशायरात त्यांची साहिर लुधियानवी यांच्याशी ओळख झाली. त्यांची मैत्री हा त्यावेळचा चर्चेचा विषय होता. या बाबतीत त्यांनी आपल्या चरित्रात उल्लेख केला आहे.
अमृता प्रीतम यांना पाकिस्तान सोडून भारतात यावे लागले त्यावेळी त्या गर्भवती होत्या. त्यावेळी रेल्वेने प्रवास करताना त्यावेळच्या स्वतः तसेच सहप्रवाशानी भोगलेल्या यातना पाहून त्यांना “अज्ज आखां वारिस शाह नूँ’ ही कविता सुचली.
लगेचच सापडलेल्या कागदाच्या तुकड्यावर त्यांनी ती कविता उतरून घेतली. हीच कविता पाकिस्तानात गीतस्वरूपात “करतार सिंह’ या चित्रपटाद्वारे लोकप्रिय झाली. पाकिस्तानातील “वारिस शाह की दरगाह’वर उरुसाचे वेळी अमृता यांची ही कविता आजही गायली जाते.त्यांना एकदा पाकिस्तानातून भारतात आलेल्या एका प्रवाशाने केळी दिली व सांगितले की, एका पाकिस्तानी नागरिकास मी भारतात जातो आहे कळल्यावर तो माझ्याकडे आला व म्हणाला “आप अज्ज आखां वारिस वाली अमृता से मिलने जा रहे हैं. मेरी तरफ से ये केले दे दीजिए, मैं बस यही दे सकता हूँ. मेरा आधा हज हो जाएगा.’ या वरून त्यांच्या लोकप्रियतेची ओळख होते.
त्यांनी पंजाबी व हिंदी भाषेत भरपूर लेखन केले. त्यांच्या “पिंजर’ या कादंबरीवर चित्रपट निर्माण झाला. त्यांचे प्रसिद्ध आत्मचरित्र “रसीदी टिकट’ यासह त्यांनी एकूण शंभर पुस्तके लिहिली आहेत. अमृता यांच्या लेखनामध्ये तसेच कवितेमध्ये महिलांवर होणारे अत्याचार व प्रश्नांना वाचा फोडली आहे तसेच फाळणीच्या दुःखाची वेदनाही जाणवते. या संबंधी नेपाळमधील एक लेखक म्हणतात, “मैं जब अमृता प्रीतम की कोई रचना पढ़ता हूँ, तब मेरी भारत विरोधी भावनाऐं खत्म हो जाती हैं।” तर प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सुमित्रानन्दन पंत म्हणतात, “अमृता प्रीतम यांच्या कवितेमध्ये, हृदयावर झालेल्या जखमा, प्रेम आणि सौंदर्य यांच्या कविता ऊन सावलीसारख्या वाटतात.
त्यांच्या कवितांनी हिंदी काव्य भावनेने समृद्ध होईल.’ वर्ष 1958 मध्ये व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी एका समारंभात अमृता प्रीतम यांनाही निमंत्रण होते.त्यावेळी हो ची मिन्ह त्यांना म्हणाले, “आपण दोघेही सैनिक आहोत, तू लेखणीने लढतेस तर मी तलवारीने लढतो.’
“दिल्ली की गलियॉं’, “एक थी अनीता’, “काले अक्षर’, “कर्मों वाली’, “केले का छिलका’, “दो औरतें’ या कथा तसेच “धूप का टुकड़ा’, “गर्भवती’, हे कविता संग्रह या साहित्यकृती उल्लेखनीय आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या अमृता प्रीतम या पहिल्या महिला मानकरी होत्या. तसेच साहित्य जगतातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार; पद्मश्री, पद्मविभूषण या पुरस्कारासह देशविदेशातील अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. 31 ऑक्टोबर 2005 रोजी त्यांचे निधन झाले.
विविधा
माधव विद्वांस