हिंदी चित्रपटांमध्ये काही अतर्क्य गोष्टी दाखवल्या जातात अशा प्रकारची टीका नेहमीच केली जाते; पण या चित्रपटांमध्येसुद्धा ज्या गोष्टी दाखवल्या जात नाहीत अशा घटना प्रत्यक्ष घडू शकतात याचाच प्रत्यय ठाणे येथील पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबारामुळे आला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा गोळीबार कुठल्या गुंडांनी किंवा टोळी युद्धातील सदस्यांनी केलेला नाही, तर लोकांनी निवडून दिलेल्या एका आमदाराने केला आहे. त्यामुळे नजीकच्या कालावधीमध्ये एखाद्या सृजनशील दिग्दर्शकाने ‘शुटआउट अॅट लोखंडवाला’ अशा चित्रपटांच्या धरतीवर ‘शूटआउट अॅट ठाणे’ अशा प्रकारच्या चित्रपटाची निर्मिती केली तर आश्चर्य वाटायला नको अशीच ही घटना आहे.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजकीय गड असलेल्या ठाणेमधील एका पोलीस स्टेशनमध्ये राज्याचे एक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप या पक्षाच्या आमदाराने प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केल्याची घटना केवळ वृत्तपत्रांच्या हेडलाइनसाठी आणि वाहिन्यांच्या ब्रेकिंग न्यूजसाठी महत्त्वाची नसून महाराष्ट्रातील राजकारण किती हीन पातळीवर पोहोचले आहे ते पाहण्यासाठी महत्त्वाची आहे. या घटनेची तुलना करत असताना ‘महाराष्ट्राचा बिहार झाला आहे की काय’ अशा प्रकारचे डायलॉग अनेकांनी फेकले; पण वस्तुस्थिती पाहता गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये बिहारमधील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे आणि गेल्या कालावधीमध्ये कोठेही बिहारमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याचे उल्लेख नाहीत. त्यामुळे विनाकारण ‘महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का’ अशी तुलना करून बिहारला बदनाम करण्यातही अर्थ नाही. कारण पुरोगामी आणि सर्वात विकसित राज्याचा शिक्का असलेल्या महाराष्ट्रामध्येच यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. याच महाराष्ट्रामध्ये अनेकदा टोळीयुद्धांचा भडका झाला आहे आणि त्यानिमित्ताने न्यायालयात किंवा रुग्णालयातसुद्धा टोळीयुद्ध झाल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात.
मुंबई असो किंवा इतर कोणतेही महानगर असो ज्यांच्याकडे पिस्तूल चालवायचा परवाना आहे ते कधी पिस्तूल बाहेर काढतील आणि गोळीबार करतील अशी कोणतीही खात्री आता राहिलेली नाही. जेव्हा आमदार पदावरील व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करते तेव्हा मात्र ती निश्चितच वेगळी घटना असते. अर्थात, या घटनेनंतर राजकारण पेटणे अपरिहार्य आहे. भाजपाचे आमदार गणपतराव गायकवाड यांनी वैयक्तिक कारणावरून हा गोळीबार केला असला, तरी ज्यांच्यावर गोळीबार झाला ते कार्यकर्ते हे शिंदे गटाचे होते, ही बाब येथे अधोरेखित होते. जमिनीच्या वादातून या सगळ्या गोष्टी घडल्या असे सांगण्यात येत असले, तरी लवकरच होणार्या लोकसभा आणि नंतर काही कालावधीनंतर होणार्या विधानसभा निवडणुकीमधील जागा वाटपाचा मुद्दासुद्धा या निमित्ताने समोर येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या आणि लोकसभेच्या अनेक जागावरून संघर्ष निर्माण होणार आहे हे उघड आहे. या गोळीबाराच्या घटनेला त्याचीसुद्धा एक झालर आहे. कारण आमदार गणपतराव गायकवाड यांना अटक केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ज्या शब्दात टीका केली आहे ते पाहता भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यातील संबंध सुरळीत राहण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृह खात्याची जबाबदारी असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्व थरातून टीकेचा ओघ सुरू झाला आहे. राज्याचे गृहमंत्री म्हणून अंतिम जबाबदारी त्यांचीच असल्याने त्यांना ही टीका स्वीकारावीच लागणार आहे. एकतर त्यांच्या अखत्यारित असलेल्या गृह खात्याच्या पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला आहे.
दुसरं म्हणजे त्यांच्याच पक्षाच्या एका आमदाराने हा गोळीबार केला आहे. या अर्थाने दुहेरी जबाबदारी त्यांना घ्यावी लागणार आहे. या प्रकरणाचे एकूणच गांभीर्य लक्षात घेता आमदार गणपतराव गायकवाड यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न केले जातील, अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. पण त्यांच्यावर होणार्या कारवाईत कोणतीही ढिलाई येणार नाही हे मात्र देवेंद्र फडणवीस यांना दाखवून द्यावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या विविध घटनांमुळे गृहखात्याच्या एकूणच कारभाराविषयी शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील विरोधी पक्षांच्या हातात हे आयतेच कोलीत मिळाले ही बाबही फडणवीस यांना दुर्लक्षित करून चालणार नाही. आमदार किंवा काही महत्त्वाच्या नेत्यांना स्वसंरक्षणार्थ जरी पिस्तूल हाताळण्याचा परवाना देण्यात आला असला तरी त्यामुळे त्यांच्या मनात वेगळीच भावना तयार होत असते आणि रागाच्या भरात अशा शस्त्राचा वापरही केला जाऊ शकतो.
काही वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मंत्री गिरीश महाजन यांनीसुद्धा नाशिक परिसरामध्ये एका बिबट्याचा शोध घेत असताना त्यांच्या कमरेला लावलेल्या पिस्तुलाचे दर्शन घडवले होते. तेव्हाही वाद निर्माण झालाच होता. साहजिकच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक उंबरठ्यावर आल्या असताना सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधित्व करणार्या नेत्यांकडून अशा प्रकारची कोणतीही चूक होणार नाही अशी दक्षता आता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना घ्यावीच लागणार आहे. ठाणे शहरात घडलेली ही घटना पोलीस स्टेशनमध्ये घडली असल्याने त्याचे गांभीर्य अधिक आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस स्टेशनमध्येच जेव्हा अशा प्रकारे कायदा धाब्यावर बसवला जातो तेव्हा तो विषय गांभीर्यानेच घ्यावा लागतो. एखाद्या गुंडांची टोळी जेव्हा हत्यारांचा वापर करते तेव्हा त्यांचा तो स्वभावधर्म असल्यामुळे तो विषय समजण्यासारखा असतो. त्यांनी न्यायालयात, पोलीस स्टेशनमध्ये किंवा रुग्णालयात केलेला गोळीबार हा समर्थनीय नसला तरी त्यांच्या स्वभावाचे प्रदर्शन घडवणारा असतो. पण लाखो लोकांनी निवडून दिलेल्या आमदाराकडूनच जेव्हा अशा प्रकारे शस्त्र हातात घेऊन कायदेभंग होतो तेव्हा मात्र हे शूटआउट जास्त गंभीर ठरते. अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रात पुन्हा घडणार नाहीत याची काळजी विद्यमान सरकारला घ्यावीच लागेल.