पश्चिम घाट व आदिवासी क्षेत्राची सुधारणा करण्यासाठी खास योजना
मुंबई – पश्चिम घाट व आदिवासी क्षेत्राची सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासन एक खास योजना तयार करणार आहे. नियोजन मंडळाने केलेल्या सूचनेप्रमाणे हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी आज विधानसभेत दिली.
गरजेएवढा कोळसा जळण म्हणून उपलब्ध झाल्यास विदर्भातील चंद्रपूर येथे औष्णिक वीजकेंद्र उभारण्यासाठी लागणाऱ्या वाढीव खर्चास नियोजन मंडळाने मान्यता दिली आहे. गरिबी हटावण्याच्या दृष्टीने नोकरीची शाश्वती देणारी योजना, न्हावा-शेवा येथे जहाज बांधण्याचा कारखाना उभारणे, मच्छिमारीस उत्तेजन देणे, चंद्रपूर येथे पोलाद कारखाना उभारणे, तारापूरच्या केंद्राचा विकास करणे अशासारख्या योजनांचाही समावेश पाचव्या योजनेत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
भारतातच राहू इच्छिणारे पाक निर्वासित
नवी दिल्ली – ज्या निर्वासितांना पाकमध्ये परत जायची इच्छा नसेल त्यांचे भारतात पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन परराष्ट्रमंत्री स्वर्णसिंग यांनी गेल्या वर्षी दिले होते, हे आश्वासन शासनाने पुरे करावे, अशी मागणी खासदार जयरामदास दौलतराम यांनी लोकसभेत केली.
पाकच्या मूळ भूमिकेत बदल झालेला नाही
नवी दिल्ली – भारतात वाटाघाटीसाठी आलेले पाक प्रतिनिधी अझीझ अहमद यांनी रावळपिंडीस परतल्यावर असा खुलासा केला की, बांगला देशास मान्यता देण्याबाबतच्या पाकच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही किंवा बांगला देशाला यूनोत प्रवेश देण्याबाबतची भूमिकाही पाकने बदललेली नाही. पाकने या दोन्ही गोष्टी करावयाच्या तर यूनोच्या डिसेंबर 1971 च्या ठरावाची अंमलबजावणी होणे जरूर आहे.