सातारा – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अमृत कलश ठेव योजना सोमवार दि. 11 पासून सुरू करण्यात येणार आहे. ही योजना 555 दिवस मुदतीची असून 7.75 टक्के व्याजदरामुळे ठेवीदारांना उत्तम परतावा मिळणार आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिली.
बॅंकेच्या अन्य मुदत ठेव योजनांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांना एक टक्का जादा व्याजदर मिळणार आहे. ग्राहकांना विविध बॅंकिंग सेवांबरोबर “एनी ब्रॅंच बॅंकिंग’ सुविधा विनाकमिशन दिली जात आहे. ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने’चा लाभ बॅंकेच्या ठेवीदारांना देण्यात येत असून दोन लाख रुपयांच्या विमा संरक्षणासाठी 20 रुपये प्रीमिअम बॅंक स्वनिधीतून भरत आहे. बॅंकेच्या ठेवीदारांनी नजीकच्या शाखेत संपर्क साधून या योजनेचा फॉर्म भरून द्यावा. बॅंकेच्या सर्व ठेवींवर आकर्षक व्याजदर देण्यात येत असून, पाच लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण सर्व ठेवींना देण्यात येत आहे. बॅंकेने कर्जवसुली सातत्याने प्रभावशाली केल्याने गेल्या 16 वर्षांमध्ये निव्वळ अनुत्पादक कर्जाचे (एनपीए) प्रमाण शून्य टक्के आहे.
बॅंकेच्या कामकाजात आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. बॅंकेने ग्राहकांना सर्वांत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. बॅंकेने दि. 1 मे 2022 पासून कर्जावरील व्याजदरांमध्ये अर्धा ते तीन टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. शासन व्याज परतावा अनुदानित कर्ज योजना बॅंकेमार्फत राबवल्या जात आहेत. कर्जावरील कमी केलेल्या व्याजदराचा आणि ठेवीवरील वाढीव व्याजदराचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी नजीकच्या शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन नितीन पाटील यांनी केले आहे. बॅंकेच्या ठेव आणि कर्ज योजनांना जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॅंकेच्या नजीकच्या शाखेत विविध ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.