सातारा – केंद्रातील मोदी सरकारविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट असून इंडिया आघाडीच्या माध्यमातून केंद्रातील सरकार उलथून पडेल. राज्यातही महाविकास आघाडी मजबूत असून 2024 मध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येईल, असा विश्वास कॉंग्रेसच्या माजी आमदार दीप्ती चौधरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
केंद्रातील भाजप सरकारने प्रति सिलेंडर 1100 रुपयांच्या माध्यमातून जनतेच्या खिशातले 8 लाख 33 हजार कोटी तर उज्वला गॅसद्वारे 2017 पासून 68 हजार 700 कोटींपेक्षा जास्त रक्कम महिलांकडून लुटली आहे. देशातील जनेतला उल्लू बनवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. राजस्थान, तेलंगणा, मिझोरम यांसह पाच राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गॅसचे दर दोनशे रुपयांनी कमी केल्याची टीका चौधरी यांनी केली. कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर सातारा येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कॉंग्रेस कमिटीत दीप्ती चौधरी बोलत होत्या. यावेळी जिल्हा निरीक्षक श्रीरंग चव्हाण- पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, प्रदेश सचिव धनश्री महाडिक, सरचिटणीस नरेश देसाई आदी उपस्थित होते. दीप्ती चौधरी म्हणाल्या, “राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो पदयात्रेला एक वर्ष पूर्ण झाले.
आता प्रत्येक भागात जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे. राहुल गांधी लोकांना भेटले तसे आम्ही लोकांना भेटणार आहोत. महागाई, बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे. रोजगार देण्याची घोषणा हवेत विरली. रोजगार मिळाले तर नाहीत पण रोजगारही गेले.” महिलांवरील वाढते अत्याचार, असुरक्षितता, मणिपूर येथील घटना काळिमा फासणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात येऊन टिळकांचा पुरस्कार स्वीकारायला वेळ आहे पण मणिपूर येथे जायला वेळ नाही ही बाब खेदजनक आहे. पंतप्रधान खुर्चीवर बसलेल्या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. असंवेदनशील सरकार आहे हे यावरून दिसत आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात आले असून 28 पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी केली असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेला लाठीमार निंदनीय असून या घटनेतील दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी. याचबरोबर राज्याच्या गृहमंत्र्यांनी या घटनेबाबत माफी मागितली असल्याने, त्यांनी लाठीमाराचे आदेश दिले असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दीप्ती चौधरी यांनी केली.