Amol Mitkari : राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे अजित पवार गटाच्या बाजूने सभागृहात बसल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी,” नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात येते. पण, प्रफुल्ल पटेल यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. पटेलांवर देखील गंभीर आरोप आहेत. मात्र, पटेलांनी अजित पवारांना भाजपाबरोबर एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नाही का? असा सवाल केला होता. याला आमदार अमोल मिटकरी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
नागपूर विधिमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमोल मिटकरी यांनी, “रोहित पवार बालमित्र संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. तसेच, त्यांना कामधंदा उरलेला नाही. एकीकडे अजित पवार भाजपाबरोबर जाणं रोहित पवारांना चालत नाही. पण, अजित पवारांनी दिलेला निधी रोहित पवारांना चालतो. कर्जत-जामखेडला ५४ कोटींचा निधी मिळाल्याबद्दल रोहित पवारांनी अजित पवारांचे आभार मानल्याचं पत्र मी ट्वीट केलं होतं,” असे अमोल मिटकरांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना अमोल मिटकरींनी रोहित पवारांच्या ‘संघर्ष यात्रे’वरही निशाणा साधला आहे. याविषयी बोलताना, “रोहित पवारांनी कुठला संघर्ष केला आहे? कशासाठी यात्रा काढत आहेत? रोहित पवारांच्या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन नाही. अन्यथा यात्रेत राष्ट्रवादीचे झेंडे दिसले असते.”असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच “प्रसिद्धीपलीकडे यात्रेत काही असेल, असं मला वाटत नाही. रोहित पवारांना आयुष्यात कधीही संघर्ष करण्याची वेळ आल्याचं वाटत नाही. बालमित्र घेऊन यात्रा निघाली नाही. त्यामुळे यात्रेला कवडीचीही किंमत नाही,” अशी सडकून टीका अमोल मिटकरांनी केली आहे.