Article 370 Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने आज जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर निकाल दिला. हा निकाल देताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ‘जम्मू-काश्मीरचा कारभार भारतीय राज्यघटनेनुसार चालवला जाईल’, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं ऐतिहासिक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकानं जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं म्हटले आहे. यानंतर कलम ३७० वर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला आहे.
मोदींनी ट्विट करत लिहिले की, ‘कलम ३७० हटवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय ऐतिहासिक आहे. यामध्ये ५ ऑगस्ट २०१९ रोजी भारतीय संसदेने घेतलेल्या निर्णयाची घटनात्मकता कायम ठेवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील आपल्या बंधू-भगिनींच्या आशा, विकास आणि ऐक्याचा तो प्रतिध्वनी आहे. न्यायालयाने आपल्या एकतेच्या गाभ्याचे सार बळकट केले आहे, ज्याला आपण भारतीय सर्वांपेक्षा जास्त मानतो.”
Today’s Supreme Court verdict on the abrogation of Article 370 is historic and constitutionally upholds the decision taken by the Parliament of India on 5th August 2019; it is a resounding declaration of hope, progress and unity for our sisters and brothers in Jammu, Kashmir and…
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2023
मोदींनी पुढे लिहिले की, ‘जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील लढणाऱ्या लोकांना मी खात्री देऊ इच्छितो की, तुमची स्वप्ने पूर्ण करण्याचे आमचे वचन आम्ही पूर्ण करू. आम्ही हे सुनिश्चित करण्यासाठी समर्पित आहोत की प्रगती केवळ तुमच्यापर्यंतच नाही तर समाजातील प्रत्येक मागास घटकापर्यंत पोहोचेल ज्यांना कलम ३७० असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. आजचा निर्णय हा केवळ कायदेशीर निर्णय नसून तो आशेचा किरण आहे. हे उज्ज्वल भविष्याचे वचन आहे आणि एक मजबूत आणि अखंड भारत निर्माण करण्याच्या आमच्या एकत्रित प्रयत्नांचा पुरावा आहे.”
After the abrogation of #Article370, the rights of the poor and deprived have been restored, and separatism and stone pelting are now things of the past. The entire region now echoes with melodious music and cultural tourism. The bonds of unity have strengthened, and integrity…
— Amit Shah (@AmitShah) December 11, 2023
याशिवाय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अमित शहा यांनीही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ट्विट करत लिहिले की, ‘अनुच्छेद ३७० हटवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. ५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान मोदींनी दूरदृष्टीचा निर्णय घेतला आणि कलम ३७० हटवण्यात आले. तेव्हापासून जम्मू-काश्मीरमध्ये शांतता परत आली आहे. एकेकाळी हिंसाचाराने उद्ध्वस्त झालेल्या खोऱ्यातील मानवी जीवनाला विकास आणि प्रगतीने नवा अर्थ दिला आहे. पर्यटनामुळे समृद्धी आली आहे आणि कृषी क्षेत्राशी संबंधित जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने हे सिद्ध झाले आहे की कलम ३७० हटवण्याचा निर्णय पूर्णपणे घटनात्मक होता.”