मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा कुख्यात गुंड दाऊद ईब्राहिमशी जोडल्या जाणाऱ्या संबंधामुळे मागील अनेक दिवसांपासून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच भाजपा नेते निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच दाऊदचा माणूस आहेत, असा संशय येतोय असा गंभीर केला होता. यासर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
आपल्या ट्विटर हँडलवरून मिटकरी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी भाषण करत आहेत आणि शरद पवार व्यासपीठावर उपस्थित आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मिटकरी म्हणतात, मुंबई ला दाऊदपासुन कुणी वाचवलं ऐका खुद्द मोदींच्या तोंडून…देवेंद्र फडणवीस व उर्वरीत गँग उत्तर देईल का?
मुंबई ला दाऊद पासुन कुणी वाचवलं ऐका खुद्द मोदींच्या तोंडुन… देवेंद्र फडणवीस जी व उर्वरीत गँग उत्तर देईल का? pic.twitter.com/zVV59J406U
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 13, 2022
अमोल मिटकरी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी, “एक चांगले प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. मुंबई जी आपली आर्थिक जीवनाला गती देणारी नगरी आहे. एक काळ असा होता की अंडरवर्ल्डने या मुंबईला उध्वस्त केलं. मुंबई अंडरवर्ल्डच्या ताब्यात गेली तर काय असा अंधःकार समोर होता. आणि मी सांगतो शरद पवार यांची हिंमत आणि कौशल्य होतं की त्यांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं, बाहेर काढलं. हे त्यांचं सामर्थ्य होतं.”म्हणताना दिसत आहे. यावरूनच आता अमोल मिटकरींनी भाजपला सवाल केला आहे.
“मला संशय येतोय की पवार साहेबच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहेत. अनिल देशमुख यांनी काय केलं होतं ? त्यांचा राजीनामा कसा झटपट घेतला होता. तेव्हा विचार केला होता का ? मग नवाब मलिक कोण आहेत. नवाब मलिक शरद पवार यांचे कोण लागतात ? ज्यांनी व्यवहार केला. ज्यांनी दाऊदच्या बहिणीला पैसे दिले. दाऊदच्या माणसाला पैसे दिले. बॉम्बस्फोटातील आरोपीला पैसे दिले, त्यांचा राजीनामा घेतला जात नाही,” असे निलेश राणे यांनी म्हटले होते.