Amol Mitkari : राज्याच्या राजकारणात काल पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना घडली. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटासमोर मोठे आव्हान निर्माण झाले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने कायदेशीर लढाईसाठी फार कमी वेळ आहे.
इतकेच नव्हे, तर कायदेशीर लढाई लढायची झाल्यास पक्ष आणि चिन्ह सुद्धा मिळणार नसल्याने मोठी रणनीती आखावी लागणार आहे. अत्यंत कमी कालावधीत लोकांपर्यंत चिन्ह पोहचविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. वयाच्या 83 व्या वर्षी शरद पवार यांना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. त्यांच्यासमोर खूप मोठ चॅलेंज आहे.
मात्र, अश्यातच राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ‘वेळ पडली तर पक्षकार्यालयाचा ताबा घेऊ’ असं विधान मिटकरी यांनी केलं आहे. माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, “राज्य सरकारने निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे.
त्यानुसार पक्षाचे कार्यालय ताब्यात घ्यायचे की नाही याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. अजित दादा जे सांगतील त्याप्रमाणे पुढील दिशा ठरवली जाईल. पक्षाचा कार्यालय वेळ पडली तर आम्ही ताब्यात घेऊ. त्यामध्ये कुठलेही दुमत नाहीये, असं अमोल मिटकरी म्हणाले.
यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला. “काही उपटसुंबांना कामधंदे राहिलेले नाहीये. संजय राऊत म्हणा किंवा मुंब्राच्या भाई म्हणा…
या सगळ्यांना कुठलेही कामधंदे राहिलेले नाहीयेत. त्यामुळे त्यांना काय बडबड करायची ते करू द्या. आमच्याकडे 50 आमदार आहेत. येत्या काळामध्ये आमचे आमदारांची संख्या अजून जास्त वाढेल. जे उरले सुरलेले आमदार आणि खासदार आहेत ते देखील आमच्याकडे येतील, असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.