मुंबई – अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलिसांबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर सुरु झालेला वाद आता बराच चिघळला आहे. या प्रकरणात आतापर्यंत, कंगनाकडून मुबईचा पाक व्याप्त काश्मीर असा उल्लेख, संजय राऊतांनी कंगनाला ‘हरामखोर’ संबोधणे, मुंबई महापालिकेकडून कंगनाच्या कार्यालयावर कारवाईचा बडगा, त्यानंतर कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख अशा घडामोडी घडल्या आहेत.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चिल्या जात असलेल्या या प्रकरणामागे वेगळाच डाव असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.
याबाबत बोलताना कोल्हे यांनी, कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. लाखो तरुणांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या हाती नोकऱ्या नाहीत. जीडीपीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. एका बाजूला अर्थव्यवस्था संकटात असताना दुसऱ्या बाजूला दर दिवशी कोरोनाचे जवळपास ९० हजार रुग्ण सापडत आहेत. आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगनाला नाहक महत्त्व दिलं जातं असल्याचा आरोप केला.
‘कंगनाचा बोलविता धनी कोण आहे, याची सुज्ञ जनतेला कल्पना आहे. कोणाला किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं,’ असंही कोल्हे म्हणाले.
…तेव्हाही पोलीस बांधवच रस्त्यावर असतात
कंगनाला महत्व न देण्याचा सल्ला देत कोल्हे यांनी, ‘कलाकारांना सामाजिक भान असायला हवं. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपायला हवी. मुंबई पोलिसांमुळे आज शहर सुरक्षित आहे. जेव्हा शहरात पाणी तुंबतं, तेव्हा आपले पोलीस बांधवच रस्त्यावर असतात. आता कोरोना काळातही तेच रस्त्यावर आहेत. अनेक पोलिसांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जीव गमावला आहे. त्यावेळी कंगना काहीच बोलली नाही. त्यामुळेच तिला आणि तिच्या विधानांना किती महत्त्व द्यायचं, याचा विचार आपण करायला हवा,’ पोलिसांना पाठिंबा दर्शवला.