जम्मू – भारतीय जनता पक्षाने आज काश्मिरी पंडितांच्या तीन संघटनांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घडवून दिली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्या व समस्या गृहमंत्र्यांच्या कानावर घातल्या.
पंतप्रधान स्पेशल रिक्रुटमेंट मोहिमे अंतर्गत काश्मिरी पंडितांच्या निर्वासितांच्या ज्या मुलांना काश्मीर खोऱ्यात नोकऱ्या लागल्या आहेत त्यांना तेथे दोन बेडरूमच्या अपार्टमेंट बांधून द्याव्यात अशी प्रमुख मागणी त्यांनी आग्रहाने केली.
काश्मीरमधून निर्वासित झालेल्यांच्या कल्याणासाठी एक कल्याणकारी बोर्ड स्थापन केले जावे अशी मागणीही त्यांनी शहा यांच्या पुढे केली. काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांना काश्मीर खोऱ्याच्या दुर्गम भागात नोकरीसाठी न नेमता त्यांना श्रीनगर आणि जवळच्याच सुरक्षित भागात तैनात केले जावे आणि त्यांच्यासाठी व्यापक विमा सुरक्षा कवच दिले जावे अशीही त्यांनी यावेळी मागणी केली.
सन 2010 पासून सुमारे तीन हजार काश्मिरी पंडितांना सरकारी नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत. काश्मिरातील दहशतवादामुळे अनेक काश्मिरी पंडित आपल्या जमिनी घाईगडबडीत विकून तेथून निघून गेले आहेत, त्या जमिनींच्या संबंधातील प्रश्न सोडवण्याची तसेच काश्मीर खोऱ्यातील मंदिरांना सुरक्षा प्रदान करण्याची मागणीही त्यांनी अमित शहांकडे केली.
शहा यांनी दिवंगत दीपक चंद यांच्या विधवा पत्नीचीही भेट घेतली दीपक चंद हे श्रीनगर शहरात शिक्षक म्हणून काम करीत होते व त्यांची दहशतवाद्यांनी अलिकडेच हत्या केली आहे. गुुज्जर बकरवाल समुदायाचीही शहांनी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.