अमरावती – हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार उद्धव ठाकरे विसरले आहेत. बाळासाहेबांचा वारसा जर कोणी जपत आहे तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जपत आहेत, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत अमित शहांनी राहुल गांधीसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बच्चू कडूंना परवानगी नाकारण्यात आलेल्या सायन्सकोर मैदानात ही सभा घेण्यात आली.
अमित शहा म्हणाले, अमरावतीमध्ये उमेश कोल्हेंची हत्या झाली होती. त्यावेळी स्वत:ला हिंदू हितरक्षण म्हणवणारे उद्धव ठाकरे यांचे सरकार हते. परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. त्यामुळे आता कोणत्याही उमेशची हत्या होणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच, नवनीत राणांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी अमरावतीकरांना केले.
राहुल गांधींवरही निशाणा साधत ते म्हणाले, राहुल गांधी हे पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहत आहेत. ते कधीही पंतप्रधान होणार नाहीत. त्यांची स्वप्न ही शेखचिल्लीसारखी आहेत.
काँग्रेस सत्तेत आले तर ट्रिपल तलाक कायदा परत आणणार असे म्हटले आहे. परंतु काँग्रेस सत्तेत येणार नाही, त्यांना येऊ देणार नाही. त्यामुळे ट्रिपल तलाक कायदा रद्द होणार नसल्याचेही शहांनी स्पष्ट केले.