मंचर (प्रतिनिधी) –आंबेगाव विधानसभा मतदार संघात अन्य भागांतून येणाऱ्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी भरारी पथके नेमली जाणार आहेत. नागरिकांची आरोग्य तपासणी केल्यानंतरच त्यांना गावात प्रवेश द्यावा, याबाबतची कार्यवाही पोलीस आणि आरोग्य विभागांनी करावी, अशी सूचना कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि. 17) केली.
अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी जितेंद्र डुडी, संतोष देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, तहसीलदार रमा जोशी, लैला शेख, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, भाऊसाहेब ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, सभापती संजय गवारी उपस्थित होते.
बैठकीत वळसे पाटील म्हणाले की, पाण्याचे टॅंकर सुरू करण्याची गरज आहे, त्याचबरोबर रोजगार हमीची कामे त्वरीत सुरू करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना वैद्यकीय सुविधांसाठी आमदार निधीतून 50 लाख रुपये दिले असून, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच उपजिल्हा रुग्णालय मंचर, ग्रामीण रुग्णालय घोडेगाव यासाठी आवश्यक साहित्य घेण्यात आले आहे. बाहेरगावहून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी, दैनिक अहवाल याबाबतही चर्चा झाली.
महसूल, पोलीस, आरोग्य आणि ग्रामपंचायत यांमार्फत संपूर्ण भागांत करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याबाबत अतिशय उत्तम काम सुरू असल्याचे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
सध्या आरोग्य यंत्रणेस आमदार निधी व महाराष्ट्र सरकारमार्फत वैद्यकीय साधनसामग्री पुरविण्यात आलेली आहे. अधिक वैद्यकीय साधनसामग्री आवश्यक आहे, ती भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, पराग मिल्क फूड्स लि. यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. सहकारमहर्षी स्व. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रमाचा खर्च टाळून 5 लाख रुपयांचा निधी आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी देणार असल्याचे मंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.