सातारा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासाचा अधिकृत आरंभ सातारा येथून झाला. 7 नोव्हेंबर 1900 रोजी त्यांनी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. या दिनाचे औचित्य व महत्व विचारात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती जागवण्याच्या उद्देशाने छ. प्रतापसिंह हायस्कूल येथे शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवस सोहळा मंगळवार दि. 7 नोव्हेबर रोजी होणार आहे. यादरम्यान समता सैनिक दलाच्या वतीनै हायस्कूलमध्ये मानवंदनाही दिली जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टीचे) महासंचालक सुनील वारे, प्रा. केशव पवार यांचे विशेष मार्गदर्शन होणार असून यावेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांनी दिली. दरम्यान समता सेनिक दलाचे प्रमुख अरुणभाऊ पोळ यांच्या नेतृत्वाखाली सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांच्या उपस्थितीत अभिवादन केले जाईल. त्यानंतर असंख्य आंबेडकर अनुयांयाच्या समवेत समता सैनिक दल शहरातून संचलन करत छ. प्रतापसिह हायस्कूल येथे दाखल होईल. येथे 11 वाजता जिल्हा परिषदेचे मान्यवर अधिकारी, शिक्षणाधिकारी, हायस्कूलचे मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत शाळेला मानवंदना देण्याचा कार्यक्रम होईल. या मानवदनेनंतर शाळेच्या पुढाकाराने होणाऱ्या मुख्य विद्यार्थी दिवस सोहळ्यात कार्यकर्ते व समता सैनिक दल सहभागी होईल.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शाळेत पाऊल पडलेच नसते तर ते सुशिक्षित व प्रज्ञावंत होणे शक्य नव्हते. शेकडो वर्षे जाती व्यवस्थेच्या एकदम तळाला गटांगळ्या खाणाऱ्या माणसाचे प्राण वाचून त्याला ‘माणूसपण’ मिळाले नसते. वंचित, उपेक्षितांवर दुःख-दैन्य-दारिद्रयाचे डोंगर कोसळतच राहिले असते. म्हणूनच डॉं.बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश युगांतराची चाहूल देणारी व इतिहासाला कूस बदलावयास लावणारी क्रांतिकारक घटना आहे, त्यामुळे हा शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा करणं आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील तमाम आंबेडकर अनुयांयांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जावळे यांनी केले आहे.