पुणे – राज्यात यंदा डाळींच्या किंमती काहीशा आवाक्याबाहेरच असल्याचे चित्र आहे. त्यात आता उडीद डाळीचाही समावेश झाला आहे. घटलेले उत्पादन क्षेत्र, कमी पीकपेरा आणि पावसाने दिलेली ओढ या बाबी या स्थितीला कारणीभूत ठरत आहेत.
राज्यात दरवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत उडीद पिकाचे क्षेत्र 3 लाख 70 हजार 252 हेक्टर इतके आहे. पण, यंदा खरीप हंगामात फक्त 2 लाख 56 हजार 214 हेक्टर म्हणजेच सरासरीच्या अवघ्या 69 टक्के क्षेत्रावर या पीकाची लागवड करण्यात आली. त्यातही कमी पाऊस झालेल्या सुमारे 50 ते 60 तालुक्यांत पिकांनी माना टाकल्या. यामुळे उत्पादन घटण्याची भीती होतीच.
शिवाय, देशभरात देखील कमी-अधिक फरकाने ही स्थिती राहिली आहे. पीक परिपक्वतेच्या अवस्थेत असताना पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण, बहुतांश राज्यांमध्ये पावसाच्या खंडामुळे उडीद पिकाची उत्पादकता घटली आहे. त्यामुळे आता उडदाची आवक कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नव्या मालाची आवक
सध्या राज्यात नव्या उडदाची आवक अनेक बाजारांमध्ये सुरू झाली आहे. यामुळेही उडदाच्या भावातील तेजी थांबली असली, तरी तुलनेने भाव 8 हजार ते 9 हजार रुपये किंवटलप्रमाणे सुरू आहे. तर, सरकारी हमीभाव प्रतिक्विंटल 6,950 रुपये इतका आहे. पण, त्यापेक्षाही अधिक भाव मिळत आहे.
रब्बी हंगामही धोक्यात
मोसमी पावसाच्या अखेरच्या टप्प्यात कमी पर्जन्यमान नोंदवले गेले. त्यामुळे क्वचित भागात रब्बी हंगामात केली जाणारी उडदाची लागवड धोक्यात आली आहे. त्यात भूगर्भ जलपातळी कमी झाल्याने रब्बीतील उत्पादनही कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आगामी काळात उडदाला चांगला उठाव राहू शकतो. त्यामुळे उडदाच्या दरातील तेजी कायम राहू शकते.
डाळीचे भाव
जसे पुरवठा कमी झाला आणि मागणी वाढली की, त्याचा थेट परिणाम किंमतीवर होतो, असे समीकरण आहे. सध्या पुणे भुसार बाजारात (घाऊक) उडीद डाळीचे भाव 11,500-13,500 रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे नोंदवले गेले. तर, किरकोळ बाजारात हे भाव 150 ते 160 रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिक आहेत.