पुणे – “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघटनांच्या वादातून विद्यार्थ्यांना मारहाण केली जात आहे. हे प्रकार थांबायला हवेत. अन्यथा विद्यापीठावर मोर्चा काढण्यात येईल,’ असा इशारा आमदार व विद्यापीठाचे सिनेट सदस्य रोहित पवार यांनी दिला आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व नवसमाजवादी पर्याय या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये सभासद नोंदणीवरुन वाद झाले. कार्यकर्त्यांमध्ये मारहाणीचे प्रकार घडले. यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्यापही या संघटनांमधील वाद कोणत्या ना कोणत्या कारणाने उफाळून येऊ लागले आहेत. विद्यार्थी संघटनांबरोबर राजकीय पक्षांनीही आंदोलनाचा धडाका लावला आहे.
राजकीय पुढाऱ्यांमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, शनिवारी आमदार पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधता. घडलेली घटना व विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर पवार यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांची भेट घेऊन चर्चा केली. विद्येच्या माहेरघर असलेल्या पुण्यातील विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाणीच्या घटना घडतात. ही बाब योग्य नाही.
मारहाणीच्या गैरकृत्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठातील वातावरण गढूळ बनू लागले आहे. हे प्रकार थांबायला पाहिजेत. विद्यापीठात विद्यार्थी संघटना असाव्यात. मात्र, त्यांनी विद्यापीठात पक्षीय राजकारण करता कामा नये, असेही पवार यांनी स्पष्ट केले.