मुंबई – काही नात्यांमध्ये लिहून घेतले जात नाही. शिवसेना आणि भाजपने कधी एकमेकांकडून कधी काही लिहून घेतले नाही. शिवसेना आणि भाजपचे नातं अतुट आहे. भावा-भावांमध्ये देखील भांडणे होत असतात. दोन भाऊ व्यावहारिक कारणामुळे वेगळे झाले म्हणून नाते संपत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सरकार पाच वर्षे चालणार – शरद पवार
सरकारचं नेतृत्व ज्यांच्या हातात आहे, ते सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत आणि दुसऱ्यांच्या कामात ते अजिबात हस्तक्षेप करत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार असा ठाम विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. शरद पवार म्हणाले, शिवसेना म्हणून आमचा कधी संपर्क आला नाही. पण बाळासाहेब ठाकरेंसोबत मित्र म्हणून खूप संपर्क होता. त्यांनी एखादा शब्द दिला तर तो शब्द ते पाळायचे. कॉंग्रेसचे निर्णय दिल्लीमध्ये होतात. आज कॉंग्रेसने निर्णय घेण्याचा पद्धतीत बदल केला असून सहकार्य करायचे, सरकार टिकवायचे ही भूमिका कॉंग्रेसमध्ये दिसत असल्याचेही पवार म्हणाले.
एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. याप्रसंगी मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक माणसाला त्याच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मोदीजींच्या केंद्राच्या विकासाचा धागा धरून आम्ही काम केले. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन काम केले. शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे त्याच उत्पादन वाढले, त्यांना हमीभाव मिळाला. सिंचनाचे प्रकल्प पूर्ण केले, असे पाटील म्हणाले.
अपुऱ्या पैशांवर बनलेले रस्ते खराब होतात. राज्यात आधी 200 मीटरला टेंडर असायचे ते बंद करून दहा किलोमीटरला एक टेंडर केले आणि दोन वर्षात रस्ता खराब झाला तर तो त्याच कॉन्ट्रॅक्टरने केला पाहिजे, असा नियम केला. आम्ही महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याचा प्रयत्न केला. अनेक रस्त्यांची कामे पूर्ण होत आली आहेत, आता त्याचे उद्घाटन चव्हाण साहेबांना करण्याचा आनंद मिळणार आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.
देश घटनेच्या चौकटीत चालला पाहिजे – अशोक चव्हाण
शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या कमी करणे, गुंतवणूकदार येतील यासाठी राज्यात पायाभूत सुविधा वाढवणे, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे आणि सामाजिक सलोखा वाढवणे, हाच आगामी पाच वर्षातील महाविकास आघाडीचा अजेंडा आहे. तसेच हा देश घटनेच्या चौकटीत चालला पाहिजे, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन केलेली महाविकास आघाडीचे हे सरकार आहे. त्यामुळे आम्ही आमच्यात कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आखला आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थही असाच होता. मात्र, माझ्या या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.