मुंबई : राज्यात करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये तीन जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 79 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. निरीक्षणाखाली ठेवलेल्या 82 पैकी 80 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 46 हजार 218 प्रवासी तपासण्यात आले आहेत.
राज्यात आजपर्यंत बाधित भागातून 288 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 82 जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 80 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही दिला आहे. आजवर भरती झालेल्या 82 प्रवाशांपैकी 79 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या 3 जण मुंबई येथे भरती आहेत.
दरम्यान, राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहे. राज्यात सध्या 39 विलगीकरण कक्षांमध्ये 361 बेड्स उपलब्ध आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 288 प्रवाशांपैकी 207 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.