सातारा – अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत 2022- 23 या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील 54 लाभार्थींना 22 लाख 76 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली.
राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत नवीन विहिरीसाठी 2 लाख 50 हजार रुपये, शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार, इनवेल बोअरींग व पंपसंचासाठी प्रत्येकी 20 हजार, वीजजोडणी आकार 10 हजार रुपये तसेच सूक्ष्म सिंचन पंप अंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी 50 हजार किंवा तुषार सिंचन संचासाठी 25 हजार रुपये या मर्यादेत अनुदान वितरीत करण्यात येते. मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वरी खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचे श्री. माईनकर यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन ही योजना पॅकेज स्वरुपात राबविली जाते.
यामध्ये विहीर पॅकेजमध्ये नवीन विहीर जोडणी आकार, विद्युत पंपसंच, तुषार किंवा ठिबक संच असे 3 लाख 5 हजार ते 3 लाख 30 हजार रुपये देण्यात येतात. जुनी विहिर दुरस्ती पॅकेजमध्ये जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, तुषार किंवा ठिबक संच, पंपसंच असे एकूण 1 लाख 5 हजार ते 1 लाख 30 हजार रुपये व शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, वीजजोडणी आकार, तुषार किंवा ठिबक संच, पंपसंच असे एकूण 1 लाख 55 हजार ते 1 लाख 80 हजार रुपये लाभाचा समावेश असल्याचे श्री. माईनकर यांनी सांगितले.