नगर – नगर शहरात गेले दोन दिवस अवकाळी पाऊस बरसत असतानाच माऊली सभागृहात स्वरधारा व टाळ्यांचा पाऊस बरसला. निमित्त होते सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या सरगम संगीत महोत्सवाचे. दोन दिवस चालेल्या या संगीत महोत्सवात देशातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. त्यांच्या बहारदार गायन, वादन, नृत्य व जुगलबंदीने नगरकर अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
सरगम संगीत महोत्सवाची सुरवात किराणा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी सुजाता गुरव (धारवाड) यांच्या तरल व लयदार शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी राग नंदच्या ‘ढूंडो बारे सैय्या’ या बंदिशीने सुरवात केली. त्यानंतर मध्य त्रितालात आजहू न आये मोरे शाम.., लागी मोरी नैना… ही केरवा तालातील ठुमरी, युवती मना दारुण रण… हे नाट्यपद व दृत एकतालातील भाग्यदा लक्ष्मी बारम्मा… हे कानडी भजन सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
धारवाड घराण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद शफीक खान यांचे बहारदार सतार वादन झाले. त्यांनी सतारीवर राग बागेश्री मध्ये आलाप, जोड, झाला, द्रुत बंदिशी तसेच मिश्र धून व भैरवी सादर केली. उस्ताद शफीक खान यांच्या सतार वादनावर खुश होत रसिकांनी ‘वा उस्ताद वा…’ अशी दाद दिली. जगप्रसिद्ध बासरी वादक पं.राकेश चौरसिया यांचे मधुर बासरी वादन झाले. त्यांना तबल्यावर प्रसिद्ध तबला वादक पद्मश्री पं.विजय घाटे यांनी अप्रतिम साथ दिली. त्यांच्यात झालेली बासरी व तबल्याची जुगलबंदी यावेळी रंगली.
महोत्सवाच्या अखेरच्या सत्रामध्ये पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या संकल्पनेतून मेलोडिक ऱ्हिदम’ अंतर्गत तालचक्र’ आविष्कार सादर करण्यात आला. यामध्ये तबला, हामोर्नियम वादन, गायन व कथक नृत्याचा अनोखा मिलाफ सादर करण्यात आला. तालचक्र’ आविष्कारात पद्मश्री पं. विजय घाटे यांनी तबला, नृत्यांगना शीतल कोलवालकर यांनी कथक नृत्य, शिखरनाद कुरेशी यांनी जंबे वाद्य प्रकार, अभिषेक सिनकर यांनी संवादिनी, सुरंजन खंडाळकर व सागर पटोकर यांनी गायनातून एकत्रित आपली कला सादर केली. त्यास उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. महोत्सवाचे सूत्रसंचालन वीणा दिघे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी आभार मानले.