सुरेश डुबल
कराड – युतीबाबत सस्पेन्स कायम असताना मंगळवारी दुपारी युतीचे चित्र स्पष्ट झाले. यात सातारा जिल्ह्यात युतीने निष्ठावंतांना गाजर दाखवल्याचे तिकीट वाटपावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाराज बंडखोरीच्या तयारीत असून जिल्ह्यात बहुरंगी लढती होण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र या नाराजांचा फटका कोणाला बसणार आणि फायदा कोणाला होणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
विधानसभेचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊनही कालपर्यंत युतीचा सस्पेन्स कायम होता. त्यामुळे नेमकी युती होणार का? झाली तर जागावाटप कसे असेल? यावर शेवटपर्यंत इच्छुकांसह मतदारांचे लक्ष लागून राहिले होते. मंगळवारी दुपारी कराड उत्तरच्या जागेचे चित्र स्पष्ट झाल्याने शिवसेना-भाजपच्या जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाले. मात्र यामध्ये शिवसेना मागच्या पावलावर गेली असून, भाजपने जिल्ह्यातही शिवसेनेपेक्षा जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेतल्याचे दिसून आले.
या जागा वाटप करताना मात्र निष्ठावंतांना डावलल्याचे समोर आले आहे. कोरेगाव मतदारसंघातून शिवसेनेचे किशोर बाचल हे आमदारकीची तयारी करत होते. मात्र युतीने त्यांचे तिकीट कापून भाजपचे महेश शिंदे यांना ऐनवेळी सेनेत प्रवेश देऊन त्यांना तिकिट दिले. महेश शिंदे यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांचे कडवे आव्हान असणार आहे. दरम्यान, किशोर बाचल यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
माण-खटाव मतदार संघ हा सेनेच्या वाट्याचा. येथे शेखर गोरे यांना शिवसेनेने विधानसभेची तयारी देखील करायला लावली होती. मात्र कॉंग्रेसचे पूर्वाश्रमीचे आमदार जयकुमार गोरे हे भाजपमध्ये आल्याने येथील जागा शिवसेनेला सोडावी लागली. त्यातच भाजपचे निष्ठावंत म्हणून अनिल देसाई यांच्या नावाची चर्चा होती. पण अनिल देसाई यांचे तिकीट कापल्याने त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. आमचं ठरलंय या गटाने माण-खटाव सर्वपक्षीय विकास आघाडी स्थापन केली आहे.
यातून त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना भाजपचे नेते दिलीप येळगावकर व प्रभाकर घार्गे यांनी साथ दिली आहे. सेनेचे शेखर गोरे यांचे तिकीट कापल्याने तेही अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. कराड उत्तर मधून मनोज घोरपडे यांनी पाच वर्षांपासून भाजपमधून आमदारकीची तयारी केली आहे. तर धैर्यशील कदम यांनी काही महिन्यांपूर्वी तयारी सुरू केली आहे. मात्र ही जागा शिवसेनेची असल्याने घोरपडे व कदम या दोघांना भाजपमधून उमेदवारी मिळाली नाही. मात्र या दोघांपैकी शिवसेनेतून कोणाला उमेदवारी द्यायची याविषयी मंगळवारी दुपारपर्यंत मातोश्रीवर खलबते सुरु होते. यात धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली गेली. येथेही निष्ठावंत मनोज घोरपडे यांचा पत्ता कट झाला.
वाई मतदारसंघात मदन भोसले यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील शिवसैनिक पुरूषोत्तम जाधव हे नाराज झाले आहेत. मदन भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे दोन वेळा निवडून आलेले आमदार मकरंद पाटील निवडणूक लढवत आहेत. येथेही जाधव यांच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष आहे.
सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे व दीपक पवार यांचे जुने राजकीय वैर. मात्र, शिवेंद्रराजे यांनी मास्टरस्ट्रोक खेळी खेळत तेही भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे साहजिकच दीपक पवार यांचे तिकीट कापले जाणार हे त्यांना माहीत असल्याने त्यांनी योग्य संधी साधत राष्ट्रवादीत उडी मारली. भाजपने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना अधिकृत उमेदवारी दिलीही आणि राजेंनी मंगळवारी अर्जदेखील दाखल केला. तर राष्ट्रवादीतून दीपक पवार हे अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे सातारा-जावली मतदारसंघातही चुरशीची लढत होणार आहे.
आयात उमेदवारांना तिकिटे
आधी निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागा, असा निरोप युतीने निष्ठावंतांना दिला होता. मात्र ऐनवेळी निष्ठावंतांना नाराज करून इतर पक्षातून आयात केलेल्या उमेदवारांना आमदारकीचे तिकिटे देण्यात आले आहेत. त्यामुळे नाराज झालेले निष्ठावंत काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. कारण या इच्छुकांपैकी बरेचजण अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मतदारसंघात अनेक उलटफेर होण्याची शक्यता आहे. याचा फटका कोणाला बसणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल.