नागरिकांसह जनावरांचे आरोग्य धोक्यात : नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा
पिरंगुट – येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांनी सोडलेले रसायनमिश्रित पाणी थेट वाहत ओढ्यात मिसळत आहे. त्यामुळे नागरिक व जनावरांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. हे रसायनमिश्रीत पाणी सोडणे बंद न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवकांनी दिला आहे.
मुळशी तालुक्याची औद्योगिक नगरी अशी पिरंगुटची ओळख आहे. परिसरात अनेक लहान-मोठे कारखाने आहेत. पिरंगुट घोटावडेफाटा रस्त्यावरील काही कारखान्यांमधून मुख्य रस्त्यावरून रसायनमिश्रीत पाणी रस्त्यावर सोडले जात असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिकांनी केला आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महमंडळकडेही तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ज्या कारखान्यांमध्ये असे दूषित रासायनिक पाणी तयार होते. त्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा त्या संबंधित कारखानदारांनी उभारली नाही.
आसपासची शेतीही बाधित
कारखान्यांकडून थेट ओढ्यामध्ये प्रदूषित पाणी सोडले जात असल्याने ओढ्याचे पाणी दूषित होते. हे दूषित पाणी जमिनीत झिरपून ओढ्याशेजारी विहिरी, कूपनलिकांत मिसळत आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यापूर्वी ओढ्याचे दूषित पाणी प्राशन केल्याने जनावरे दगावली होती. त्याचबरोबर रासायनिक पाण्यामुळे आसपासची शेतीसुद्ध बाधित झाली असून, शेती उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.
कारखान्यांमधून रसायनमिश्रित पाणी सर्रासपणे रस्त्यावर सोडले जात आहे. सांडपाणी उघड्यावर सोडू नये अशी वारंवार विनंती करूनही हे कारखाने कोणतीच उपाययोजना करीत नाही. परिणामी सोडलेल्या दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पाण्यामुळे दोन शेतकऱ्यांची दुभती जनावरे दगावली आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे लेखी तक्रार केली आहे.
– महेश वाघ, सदस्य, पिरंगुट ग्रामपंचायत