चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात बाहेरगावातून आलेल्या सगळ्यांना अंडर होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या शहरातील अनेक तरुण शिक्षणासाठी बाहेरगावी राहतात मात्र कोरोनाच्या भीतीमुळे हे सगळे आपल्या गावी परतले. त्यामुळे ग्रामिण रुग्णालयाने गावातील सगळ्या तरुणांची चौकशी करुन त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का आणि घराबाहेर एक पत्रक लावले आहे.
या घरातील लोक होम क्वारंटाईन आहे. त्यामुळे त्यांना भेटण्याची परवानगी नाही. त्यावर नाव, किती लोक क्वारंटाईन आहे आणि किती तारखेपर्यंत क्वारंटाईन असणार आहे, असं या पत्रकात लिहीलं आहे. ग्रामिण रुग्णालयाचे कर्मचारी सगळ्यांची फोन करुन चौकशी करत आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही आहे. मात्र कोरोनाची लागण होणार नाही याची सर्व स्तरावर खबरदारी घेतल्या जात आहे.