पिंपरी (प्रतिनिधी) – शहरात विनाकारण फिरणाऱ्या ५० दुचाकीस्वारांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. संचारबंदीचे आदेश असतानाही अनेकजण विनाकारण शहरात दुचाकीवरून फिरत असतात. याबाबत आत्तापर्यंत ९०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरीदेखील रस्त्यावरील वाहनांची कमी होताना दिसत नाही. यामुळे सरकारने फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इंधन देण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील अनेकजण काहीही कारण नसताना आपली दुचाकी रस्त्यावर आणत आहेत.
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना आळा बसावा म्हणून वाकड पोलिसांनी आता कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी बुधवारी दिवसभरात तब्बल ५० दुचाकी जप्त केल्याची माहिती वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली. पोलिसांच्या कारवाईमुळे विनाकारण शहरात दुचाकीवरून फिरणाऱ्या तरुणांचे धाबे दणाणले आहे. यापुढील काळातही पोलिस अशाच प्रकारची कडक कारवाई करणार आहेत.