मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. त्यानुसार सर्व मित्र पक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडीचे जागावाटप आणि उमेदवार दोन तीन दिवसात जाहीर होतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (21 मार्च) दिली. महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा झाली असून वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकप या मित्रपक्षांशी बोलणी झाली असून वंचितसोबतही आजही चर्चा झाल्याचे पटोले यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील उमेदवार निश्चित करण्यासाठी काल, नवी दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीनंतर आज काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
त्यानंतर आज टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली. महविकास आघाडी राज्यातील सर्व 48 जागा लढवत आहे. आघाडीतील सर्व मित्रांशी चर्चा करून काही जागांची अदलाबदल होऊ शकते आणि याबाबतचा निर्णय दोन दिवसात होईल, असे पटोले म्हणाले.
पटोले यांनी भाजपावर जोरदार टीका करताना म्हटले की, भाजपाने मागील 10 वर्षात देश बरबाद केला. लोकशाही, संविधानाला न जुमानता मनमानी कारभार केला आहे. महाविकास आघाडी मजबूत करून भाजपच्या या अत्याचारी सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच आमचे लक्ष्य आहे. राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला त्या आसुरी शक्तीविरोधात काँग्रेसचा लढा आहे.
परंतु भाजपाकडे मुद्देच नसल्याने त्यांनी शक्ती शब्दाचा विपर्यास केला. मणिपूरमध्ये तसेच देशभरात महिला अत्याचार होत असताना भाजपा आणि मोदींना नारी शक्तीची आठवण का झाली नाही? आजच नारी शक्ती कशी आठवली? असा सवाल पटोले यांनी केला.