कॉंग्रेस महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची माहिती
मुंबइृ : राज्यात आज सकाळपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. कारण आज सकाळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. अजित पवार हे शुक्रवारी रात्री साडेसातपर्यंत आमच्याबरोबर बैठकीत होते. मात्र बैठकीतून ते अचानक उठले आणि माझे वकिलांकडे काम आहे, असे म्हणत तेथून निघून गेले. त्यानंतर आज सकाळी उठल्यानंतरच हे सर्व माहीत झाले, अशी प्रतिक्रिया खर्गे यांनी प्रसारमाध्यमांसमोर दिली.
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या नेत्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. कॉंग्रेसचे दिल्लीतील नेतेही सध्या मुंबईत आहेत. बैठकीला रवाना होण्यापूर्वी खर्गे यांनी ही माहिती दिली. शुक्रवारी दिवसभर तिनही पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरु होते. या बैठकीला काही वेळ अजित पवारही उपस्थित होते. त्यांनी चर्चेमध्ये भागही घेतला होता.
शिवसेना-कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सत्ता स्थापण्याचा दावा करतील असे बोलले जात होते. परंतु, तत्पूर्वीच भाजपच्या वतीने सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या पत्राचा गैरवापर केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. याबाबत आता शरद पवार हेच बोलतील असे त्यांनी म्हटले.