पुणे – भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संशोधनासंदर्भात बहुआयामी शिक्षणप्रणाली राबविण्याचे धोरण आखले आहे. यामागे विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करून भारताला ज्ञान महासत्ता बनविण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी शिक्षकांनी अधिक सर्जनशील होऊन वेगवेगळ्या विषयांवरील सखोल माहिती विद्यार्थ्यांना प्रदान करावी लागेल, असे प्रतिपादन भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 च्या मसुदा समितीचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांनी केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे आयोजित “उच्च शिक्षणातील बदलत्या प्रतिमानांची शक्यता आणि आव्हाने’ या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी सहभाग घेतला.
करोना प्रादुर्भावानंतर उच्च शिक्षणात अनेक बदल होत आहेत. या बदललेल्या परिस्थितीकडे एक संधी म्हणून शिक्षण विभागाने बघितले पाहिजे, असे सांगत डॉ. के. कस्तुरीरंगन म्हणाले, भारत सरकार विद्यार्थी केंद्रित शैक्षणिक धोरण आखत आहे. यात विद्यार्थ्यांचा सर्वसमावेशक (व्हॉलिस्टिक) विकास साधण्याचा हेतू आहे. सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचे आव्हान असले तरी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करून समग्र विकास साधता येईल. उच्च शिक्षणात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात समतोल राखावा लागेल.