कोल्हापूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून 25 लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी केले.
कणेरी मठ येथे 20 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. त्यामुळे भविष्यात सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. गट शेती, क्लस्टर बरोबरच नैसर्गिक शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी शासनामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत. भारत हा कृषिप्रधान देश आहे. नदीला, मातीला माय मानणारी आपली संस्कृती असून या संस्कृतीचे जतन आणि रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण व संस्कृती रक्षणाची चळवळ पुन्हा जोमाने सुरु होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
नदीला, मातीला माय मानणारी आपली संस्कृती असून या संस्कृतीचे जतन आणि रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण व संस्कृती रक्षणाची चळवळ पुन्हा जोमाने सुरु होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी व्यक्त केली. pic.twitter.com/VhKDfT5buS
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 20, 2023
विकास योजना व प्रकल्प राबवताना पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम केले जात असून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर 33 लाख झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. आपले शासन सर्वसामान्यांचे शासन असून शासनाने घेतलेले निर्णय लोकाभिमुख आहेत. यास केंद्र शासनाचेही सर्व सहकार्य असून केंद्राकडून सर्व प्रस्ताव मंजूर होत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
Maharashtra : फडणवीसांच्या विश्वासू अधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांच्या ‘प्रधान सचिवपदी’ नियुक्ती
काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी काळाची गरज ओळखून सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाची संकल्पना मांडल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वामीजींना धन्यवाद दिले. अध्यात्म शास्त्र आणि नैसर्गिक तत्त्वाची सांगड घालून सिद्धगिरी मठावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. हा लोकोत्सव मठाचा किंवा शासनाचा नसून प्रत्येकाचा आहे. या संकल्पनेत प्रत्येकाने सहभाग व योगदान दिल्यामुळेच हा लोकोत्सव यशस्वी होत आहे. पर्यावरणाचा संदेश देणारा हा लोकोत्सव चळवळ व्हावी व हा उत्सव घराघरात पोहोचावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.