पाटणा – बिहारमधील संयुक्त जनता दलाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा होती, त्या उपेंद्र कुशवाह यांनीच आज संयुक्त जनता दल अर्थात जेडीयूला रामराम करत नव्या पक्षाची घोषणा केली आहे. आपण आता राष्ट्रीय लोक जनता दल स्थापन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
गेल्या काही काळापासून कुशवाह नाराज होते. नितीश आणि राष्ट्रीय जनता दल एकत्र येण्यापूर्वी कुशवाह हेच नितीश यांचे उत्तराधिकारी असतील असे मानले जात होते. मात्र राजद सोबत आल्यानंतर आता राज्याच्या सत्तेच्या सुकाणू लालू प्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याकडे जात असल्यामुळे कुशवाह नाराज होते. तेव्हापासूनच त्यांनी जाहीर नाराजी व्यक्ती करण्यास सुरूवात केली होती.
नितीश यांनाही ते टार्गेट करत होते. आजही पत्रकार परिषदेत घोषणा करताना ते म्हणाले की, नितीश यांच्या संयुक्त जनता दलात काही मोजके जण सोडले तर बाकी सगळे चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे आमची बैठक झाली आणि नवा पक्ष स्थापनेचा निर्णय घेण्यात आला.
त्यांच्यासोबत किती आमदार आहेत, नितीश सरकारला धोका आहे का याबाबत काही स्पष्ट झाले नाही. आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आपली निवड करण्यात आली असून कर्पूरी ठाकूर यांच्या विचारधारेवर पक्ष पुढे नेण्याचे काम आपण करू असेही कुशवाह यांनी नमूद केले.
राज्यात 25 लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री शिंदे
भाजपची नितीश कुमारांवर टीका…
नितीश कुमार यांना आपला स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही आणि त्यांना देशाचे पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडत आहेत अशा बोचऱ्या शब्दांत बिहारमधील भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी टीका केली. नितीश यांना देवेगौडा व्हायचे आहे की इंद्रकुमार गुजराल असा सवाल करतानाच असे पंतप्रधान पद पाच सहा महिन्यांच्या वर टीकत नाही अशी टिप्पणीही प्रसाद यांनी केली. लालू आणि तेजस्वी यांच्या फेऱ्यात नितीश सापडले आहेत व त्यांना तिकडून काही महत्वच मिळत नसेल तर आम्ही काय बोलणार असेही प्रसाद म्हणाले.