शिर्डी – निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडले जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सदाशिव लोखंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.इंग्रजांनी पाण्याचे साम्राज्य दिले, मात्र नगर जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी 2005 च्या समन्यायी पाणीवाटप कायदा करून जायकवाडीला पाणी दिले. यामुळे शेतकऱ्यांचे हक्क हिरावून घेण्यात आले. आता होणाऱ्या आंदोलनात सामील होणार असून पहिला गुन्हा आपल्यावर दाखल करा, असा इशारा खा. लोखंडे यांनी मंगळवारी शिर्डीत झालेल्या बैठकीत दिला.
पश्चिमेचे पाणी अडवून घाटमाथ्याचे पाणी आल्याशिवाय जायकवाडीलाच्या पाण्याचा हिशोब नाही, असे खा. लोखंडे यांनी ठणकावून सांगितले. आता राजकारण बाजूला ठेऊन शेतकऱ्यांना पाणी द्यायचे आहे. टेलपर्यंतचे बंधारे व तलाव भरण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी बोलावलेल्या या बैठकीला शेतकरी संघटनेचे विठ्ठल शेळके, निळवंडे पाटपाणी समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, गंगाधर गमे, नितीन कापसे, गंगाधर चौधरी, उत्तम घोरपडे, विठ्ठल घोरपडे, सुखलाल गांगवे, राजेंद्र सोनवणे, सुरेश तरके, संपतराव चौधरी, संजय सदाफळ, रावसाहेब थोरात, महेश देशमुख, राजेंद्र रोहम, राजेंद्र कार्ले यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
गोदावरी, मुळा, निळवंडे व भंडारदरा धरणातील आवर्तनच शेतकऱ्यांसाठी कमी आहे. त्यात जायकवाडी पाणी देऊन नगर व नाशिकवर आणखी अन्याय कशाला?. याप्रश्नी लवकरच शेतकऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेतली जाणार असल्याचे खा. लोखंडे यांनी सांगितले. 2005 चा कायदा तयार करणाऱ्या नेत्यांचा यावेळी घोषणा देत निषेध व्यक्त केला.
…तर अधिकाऱ्यांना चोप देणार
निळवंडेच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या केलवड, आडगाव ते पिंपरी निर्मळ गावातील तलाव व बंधारे पूर्ण भरू न देण्यासाठी निळवंडे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांवर मुजोरी करीत असल्याचा आरोप निळवंडे समितीचे घोरपडे यांनी केला. अधिकाऱ्यांनी दादागिरी केली तर त्यांना चोप देणार असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.