वडगाव मावळ – विकासाकरिता गावामध्ये एकोपा रहावा, यासाठी काही ठिकाणी निवडणुका बिनविरोध केल्या. 21 पैकी 14 गावांमध्ये आमच्या विचारांचे सरपंच निवडून आले. मात्र त्यानंतरही कोणी जर सर्वाधिक ग्रामपंचायतीवर आपलेच उमेदवार निवडून आल्याचा दावा करीत असेल तर आगामी निवडणुकीत तुम्ही भाजपच्या पॅनेलवर निवडणुका लढवा आणि आम्ही राष्ट्रवादीच्या पॅनेलवर निवडणूक लढवू. मग बघू कोण बाजी मारेल, असा टोला आमदार सुनील शेळके यांनी भाजपला लगावला.
मावळ तालुक्यात सर्वाधिक आमचे सरपंच निवडून आल्याचा दावा सोमवारी (दि. 6) भाजपने केला होता. तसेच हा विजय म्हणजे आगामी विधानसभेची नांदी असल्याचेही ते म्हणत होते. भाजपच्या या दाव्याला उत्तर देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले. तसेच आगामी निवडणुकीकरिताही भाजपला आव्हान दिले.
मंगळवारी (दि. 7) राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना शेळके म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूक ही गावकी-भावकीवर लढविली जाते. गावच्या विकासाकरिता आपण त्यापासून अलिप्त रहायचे, असे ठरविले होते. मात्र आता निवडून आलेल्यांना विरोधक त्यांच्या पट्ट्या घालून मिरवत आहेत.
भाजपला दिले खुले आव्हान
शेळके म्हणाले की, सहा महिन्यांनी निवडणुका होणार आहेत. त्यावेळी तुमची इच्छा पूर्ण करा. तुम्ही भाजप पुरस्कृत उमेदवार उभा करा अन् मी राष्ट्रवादी कॉंगेस पुरस्कृत उमेदवार उभा करतो. मग बघुया की मावळ विधानसभेवर कोणाचे वचर्स्व आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 21 पैकी सात ग्रामपंचातीवर भाजप विचाराचे सरपंच निवडून आले आहे. मी जर पक्षाची ताकद लावली असती तर त्यांचे दोनच सरपंच निवडून आले असते. मात्र सरपंच यांनी सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास केला पाहिजे. सरपंच म्हणजे गावचा मालक नाही, हे देखील त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
त्यांच्याकडूनही निधी घ्या
नव्याने निवडणूक झालेल्या सिंगल ग्रामपंचायतीकरिता सुरवातीला 25 लाखांचा निधी विकासाकरिता देणार आहे. तर ग्रुप ग्रामपंचायतीसाठी 50 लाखांचा निधी देणार आहे. येत्या मार्च महिन्यांतर आणखी निधी देणार आहे. जर कोणी गावाच्या विकासाकरिता शासनाकडून निधी आणणार असेल तर त्यांचाही निधी घ्या. कोणाकडूनही निधी घेण्यास मी विरोध करणार नाही. असेही सुनील शेळके यांनी नवनिर्वाचित सरपंचांना सांगितले.