नगर – मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय देणे आवश्यक आहे. मात्र तसा कोणत्याही हालचाली होतांना दिसत नाही. त्यामुळे शासन निर्णय घेत नाही. मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. त्यामुळे त्यांचा अंत न पाहता शासनाने तातडीने आरक्षणासंदर्भात निर्णय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) राजेंद्र फाळके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे आठ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले आहे. त्यांची प्रकृती सध्या खालावत चालली आहे. राज्यभरात जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून गावबंद, साखळी उपोषण, रास्ता रोको, कॅण्डल मोर्चा आदी आंदोलने करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी आंदोलने उग्र झाली आहेत. याचा विचार करून शासनाने तातडीने मराठा आरक्षणाबाबत निर्णय द्या, अशी मागणी फाळके यांनी केली आहे.