– आकाश वशिष्ठ
हिमाचल प्रदेश, कर्नाटक या राज्यांत विजय मिळवल्यामुळे कॉंग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. आता पाच राज्यांपैकी महत्त्वाच्या तीन राज्यांत जर कॉंग्रेस विजयी झाली, तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीला आणखी बळ मिळेल.
भारतीय जनता पार्टीला पर्याय म्हणून “इंडिया’ आघाडी अस्तित्वात आली. पर्याय हा सौम्य शब्द आहे. प्रत्यक्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीला सत्तेवरून घालवण्यासाठीच आघाडीचा जन्म झाला आहे. अर्थात, हे काही विशेष नाही. केंद्रात एका विशिष्ट पक्षाकडे पाशवी बहुमत असेल आणि त्या पक्षाला पराभूत करण्यासाठी संख्याबळ जमवण्याची कोणा एका पक्षाची ताकद नसेल, तर आघाड्यांचे जन्म होत असतात. तसा “इंडियाचा’ जन्म झाला आहे. आघाडीच्या सलग तीन बैठका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. फार काळ यांचे जमणार नाही हे दावे त्यामुळे फोल ठरले. पण विधानसभा निवडणुकांनी अपेक्षेप्रमाणे मिठाचा खडा टाकला आहे. आघाडीतील ज्या मित्रपक्षांकडून उपद्रव अपेक्षित होता त्यांनी अगदी तशीच वर्तणूक केली आहे. भविष्यातही त्यांच्याकडून फार जबाबदारपणाची वागणूक अपेक्षित नाही. तरीही त्यांना आघाडीत सोबत ठेवून जर देशातील सत्तांतराचे उद्दिष्ट सगळ्यांना आणि विशेषत: कॉंग्रेसला साध्य करायचे असेल, तर पाचपैकी किमान तीन राज्यांत विजय मिळवणे त्यांना क्रमप्राप्त आहे.
सव्वाशे वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कॉंग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे 88वे अध्यक्ष आहेत. पक्षाचा ते दलित चेहरा आहेत आणि पूर्णत: कॉंग्रेसच्या संस्कृतीत त्यांची वाढ झाली आहे. मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड आक्रमक नेत्यांमध्ये खर्गेंचे नाव अग्रभागी आहे. वयाची 80 पार केलेल्या खर्गेंनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या वर्षभराच्या कारकिर्दीत पक्षात असलेले अनिश्चिततेचे वातावरण बहुतांशी संपवले आहे. ज्येष्ठ नेत्यांची गळती थोपवली आहे, पक्षाची रेषा ओलांडून आपले मत दामटण्याचा प्रकार गेल्या वर्षभरात कोणाला त्यांनी करू दिलेला नाही. अंतर्गत ज्या कुरबुरी आहेत त्याही बऱ्यापैकी क्षमवल्या आहेत. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत, तथापि, खर्गे यांच्या आव्हानांचा काळ आता खरा सुरू होणार आहे, किंबहुना तो सुरू झाला आहे. त्यातून ते नाव कशी बाहेर काढतात, पक्षात चुकीचा संदेश जाऊ न देता आघाडीला कसे जोडून ठेवतात यात त्यांची कसोटी लागणार आहे.
मध्य प्रदेश निवडणुकीच्या संदर्भाने त्यांना अगोदर अप्रिय घटनांचा सामना करावा लागला. तत्पूर्वी दिल्लीतही त्याच स्वरूपाची घटना घडली. मध्य प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने कॉंग्रेसला आपल्या उपद्रव क्षमतेची चुणूक दाखवली. त्यांनी आपले उमेदवार विधानसभा निवडणुकीत उतरवण्याची एकतर्फी घोषणा केली आणि मध्य प्रदेशचा दौराही केला. या दौऱ्यात त्यांनी कॉंग्रेसवरच गोळीबार करत या पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यांना हव्या असलेल्या जागा मिळण्यात अडचण असल्याचे दिसू लागताच त्यांनी उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला जशास तशी वागणूक दिली जाईल, अशी धमकीही दिली. दिल्लीतही कॉंग्रेसच्या काही उत्साही नेत्यांनी लोकसभेच्या सर्व जागा लढण्याची सूचना आम्हाला करण्यात आली असल्याचे परस्पर जाहीर करून टाकले.
आघाडीत असलेल्या अरविंद केजरीवाल यांना हा इशारा होता आणि त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यानुसार केजरीवाल आणि पार्टी रिऍक्ट झाली. केजरीवाल महत्त्वाकांक्षी आहेत, तद्वतच अखिलेशही आहेत. मात्र केजरीवालांना केंद्रात जायचे आहे, अखिलेश यांचे सध्याचे टार्गेट केवळ उत्तर प्रदेश असेल. आघाडीत ममता बॅनर्जी नामक तिसऱ्या महत्त्वाकांक्षी नेत्या आहेत. त्यांनाही दिल्ली खुणावते आहे. देशातील सत्तांतरासाठी या तीन नेत्यांना सोबत ठेवणे आवश्यक आहेच आणि येथेच कॉंग्रेसचा कस लागणार आहे. सध्या होत असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुका यादृष्टीने कॉंग्रेससाठी महत्त्वाच्या असणार आहेत.
महाराष्ट्रातील शरद पवार गट, तमिळनाडूतील द्रमुक आणि बिहारमधील लालू यांचा राष्ट्रीय जनता दल हेच कॉंग्रेसचे विश्वासार्ह सहकारी पक्ष आहेत. इंडिया आघाडीत तसा 26-27 पक्षांचा भरणा आहे आणि विश्वासार्हतेच्या बाबतीत या प्रत्येकाचा वेगळा इतिहास आहे. यातील बहुतेक जण अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात अटलजींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मांडवाखाली जाऊन आलेले आहेत आणि आता दोन दशकांनंतर त्यांच्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा प्रचंड वाढलेल्या आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांत मतदान होते आहे. यातील राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये कॉंग्रेसचे सरकार आहे व तेथील सत्ता राखण्याचे कॉंग्रेससमोर आव्हान आहे. आजची स्थिती या दोन्ही राज्यांत कॉंग्रेससाठी अनुकूल आहे.
मध्य प्रदेशातही कॉंग्रेस सत्तावापसी करू शकते. तेलंगणामध्येही गेल्या काही आठवड्यांत कॉंग्रेसने मुसंडी मारली आहे. तीन किंवा चार राज्यांत कॉंग्रेसचा विजय झाला, तर कॉंग्रेसची इंडिया आघाडीतील पत वाढणार आहे. अर्थात, आताही कॉंग्रेसचा त्या आघाडीतील सहभाग हाच त्या आघाडीच्या संभाव्य एकसंधतेचा पाया आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत कॉंग्रेसचे झालेले खच्चीकरण पाहता अन्य घटक पक्षांनी कॉंग्रेसला आपल्यापेक्षा कमी लेखण्याचा प्रमादही घडला आहे. तीन राज्यांत कॉंग्रेसचा विजय कॉंग्रेसला आवश्यक असलेली उभारी आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यात महत्त्वाचा ठरणार आहे. तसे झाले तर विरोधी आघाडीला कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी असा आता लिखित नसलेला दर्जा आपोआपच प्राप्त होणार आहे. तो देशातील जनतेसाठीही सक्षम पर्याय असेल आणि त्यामुळे मतदानावरही मोठा प्रभाव पडेल.
आप, तृणमूल आणि सपा या पक्षांनी त्यांच्या प्रभावक्षेत्राबाहेर जात कॉंग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला आहे. इंडिया आघाडीच्या पलिकडे या तीन पक्षांनी परस्परांची खासगी आघाडी उभारण्याचीही चाचपणी केलेली आहे. ही खासगी आघाडी त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवू शकणार नाही, तथापि, कॉंग्रेसच्या मागे आम्ही फरफटत जाणार नाही असे त्यांनी त्याद्वारे अगोदरच सूचित केले आहे. जर तीन राज्ये कॉंग्रेसने जिंकली तर या पक्षांची सौदेबाजीची ताकद कमी होईलच आणि देशातील अन्य राज्यांतही कॉंग्रेससाठी हे तीन विजय शुभसंकेत असतील. मल्लिकार्जुन खर्गे यांनी तातडीने पुढाकार घेत अखिलेश यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि फार डॅमेज होऊ दिले नाही. तेच आपच्या बाबतीतही त्यांना साधता आले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्यात कॉंग्रेसला अनुरूप असा कौल लागला आणि मतदारांनी कॉंग्रेसवरील विश्वासाचे शिक्कामोर्तब केले तर खर्गेंचे काम सोपेच होईल. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यास एक नवीन आत्मविश्वास बळ त्यांना आणि कॉंग्रेसला प्राप्त होईल.