सातारा – सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून देण्यात येणार्या ऊसदराबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ठाम भूमिका घेतल्याने, कारखानदारांच्या प्रतिनिधींनी 3100 रुपये दर जाहीर केला. मात्र, पहिला हप्ता 3500 रुपयेच देण्याची आक्रमक भूमिका शेतकरी संघटनांनी कायम ठेवली. त्यामुळे या बैठकीत दरावर तोडगा निघाला नाही. त्यावर, आता कारखानदारांना लवकर निर्णय घ्यावा, अशी सूचना जिल्हाधिकार्यांनी केली. मात्र, विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन, दोन दिवसांनंतर गनिमी काव्याने आंदोलन आणि साखर अडवण्याचा इशारा दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराचा तिढा संपल्याने, सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार किती दर देणार, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले होते. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत साखर कारखानदारांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, बळीराजा शेतकरी संघटना यांच्या पदाधिकार्यांची बैठक झाली. यावेळी रघुनाथदादा पाटील, पंजाबराव पाटील, राजू शेळके, विकास जाधव, मधुकर जाधव, देवानंद पाटील उपस्थित होते.
या बैठकीत साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींकडून दर जाहीर होत नसल्याने, डुडी यांनी जागेवरच दर जाहीर करण्याची सूचना कारखान्यांच्या प्रतिनिधींना केली. त्यानंतर प्रतिनिधींनी यावर्षी उसाला पहिला हप्ता प्रतिटन 3100 रुपये देण्याचे जाहीर केले. त्यावर शेतकरी संघटनांचे समाधान झाले नाही. शेतकरी अडचणीत आहे. साखरेला दर चांगला मिळत असल्याने, उसाला पहिला हप्ता 3500 रुपयेच मिळाला पाहिजे, अशी ठाम भूमिका संघटनांच्या पदाधिकार्यांनी घेतली. गेल्या वर्षी तोडणी झालेल्या उसालाही टनामागे पैसे देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर चर्चा होऊन काहीच निर्णय झाला नाही. जिल्हाधिकार्यांनी याबाबत कारखानदारांना काही सूचना केल्या. सायंकाळपर्यंतच दराचा निर्णय घेण्याबाबत त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली.
दरम्यान, बैठकीनंतर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आक्रमक भूमिका कायम ठेवली. उसाला पहिला हप्ता 3500 रुपये मिळालाच पाहिजे. गेल्या वर्षी तोडलेल्या उसाचे पैसे मिळावेत, यासाठी कारखानदारांना दोन दिवसांची मुदत दिली आहे. या दोन दिवसांत दराबाबत समाधानकारक निर्णय न झाल्यास गनिमी काव्याने आंदोलन करू, ऊस वाहतूक रोखण्याबरोबरच रास्ता रोको करण्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे.
जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहे. दुसरीकडे साखरेला चांगला दर मिळत आहे; परंतु शेतकर्यांना चांगला दर देण्याची साखर कारखानदारांची तयारी नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार समाधानकारक दर देऊ शकतात, तर सातारा जिल्ह्यातील कारखानदारांना काय होते? ऊसदराबाबत दोन दिवसांत समाधानकारक निर्णय न झाल्यास, आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी निर्णायक लढा देऊ.
– राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
रघुनाथदादांची पाच हजारांची मागणी
शेतकरी संघटनेच्या रघुनाथदादा पाटील यांनी उसाला पहिला हप्ता पाच हजार रुपये द्या, नाही तर दोन कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करा, अशी मागणी केली. याबाबत निर्णय न झाल्यास कारखान्यांची साखर अडवण्याचा इशारा त्यांनी दिला.
===================