राहुरी -राज्य सरकारचा समन्यायी कायदा हा प्रत्यक्षात विषमन्यायी कायदा आहे. रब्बी हंगामातील जायकवाडीची आर्वतने व मुळाची आवर्तने यात फरक आहे. पाणी जायकवाडीला आम्ही सोडू देणार नाही, असा इशारा आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिला.
आ. तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आज (मंगळवार) शिष्टमंडळाने तहसीलदार चंद्रजित राजपूत व मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना निवेदन दिले. या वेळी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, सुरेश निमसे, रवींद्र आढाव, नंदकुमार तनपुरे, दशरथ पोपळघट, अशोक आहेर, संजय साळवे, सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब उंडे, किशोर जाधव, रामदास बाचकर, रखमाजी जाधव, विजय कातोरे, ज्ञानदेव वराळे, महेश उदावंत, बाळासाहेब गाडे, भारत कोरडे, जालिंदर गाडे, अमोल मोढे, रमेश वने, ललित चोरडिया, रामदास वने, राहुल म्हसे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
या वेळी आ. तनपुरे म्हणाले की, तालुक्यात यावर्षी 50 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक गावात आजच पाण्याच्या टॅंकरची मागणी सुरू झाल्याने सरकारने मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडू नये. सरकारने पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आ. तनपुरे यांनी दिला.
तालुक्यात 50 टक्क्यांपेक्षाही पाऊस कमी झाल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानासुद्धा सरकारने तालुक्यात अद्याप दुष्काळ जाहीर केला नाही. उलट जायकवाडी धरणात मुळा धरणातून 2.10 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असून, त्यातील 50 टक्केच पाणी जायकवाडीला जाऊन उर्वरित 50 टक्के पाण्याचा अपव्यय होणार आहे. जायकवाडीमधून मागील हंगामात 7-8 आवर्तन शेतीसाठी सुटली होती. मुळा धरणातून मात्र 3-4 आवर्तन शेतीसाठी मिळाली होती.
शेतीसाठी रब्बीचे 2-3 आवर्तन जायकवाडीतून झाले असून, मुळातून मात्र अजूनही आवर्तन देण्यात आले नाही. मुळा धरणातील रब्बीचे आवर्तन सोडण्याचे नियोजन नाही. जायकवाडीच्या बॅक वॉटरमधून अनधिकृतपणे आकडे टाकून वीजपंप लावून पाणी उचलले जात असून, त्याद्वारे 2 ते 4 टीएमसी पाण्याचा अनधिकृत वापर होताना दिसत आहे. मुळेतून दिलेल्या पाण्याचा वापर तेथे दारूच्या कारखान्यांना, इतर कामांना होत असताना राहुरी तालुक्यातील जनतेला मात्र पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी आ. तनपुरे यांनी केली.
या वेळी झालेल्या चर्चेत कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तहसीलदार रजपूत यांनी शेतकऱ्यांच्या भावना पाणी सोडण्याबाबत तीव्र असून त्या शासनास कळवितो, असे सांगितले. चर्चेत माजी आ. भाऊसाहेब कांबळे, बाबासाहेब भिटे, दत्तात्रय वने, बाळासाहेब खुळे, दिलीप इंगळे, अप्पासाहेब ढूस, आदिनाथ तनपुरे, विलास शिरसाठ, प्रकाश भुजाडी, गजानन सातभाई आदींनी भाग घेतला.