आत्मनिर्भर भारतासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे
भाजप प्रदेशाध्यक्ष आ. बावनकुळे यांचा वॉरियर्शसी संवाद
राहाता – आत्मनिर्भर भारताच्या विकासासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील ४५ जागा जिंकायच्या असून, याकरिता प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिवसातले ३ तास १३ मिनिटे पक्षकार्याला समर्पित भावनेने द्यावेत, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राहाता, श्रीरामपूर, नेवासा या तीन विधानसभा मतदारसंघातील वाॅरियर्सशी संवाद साधण्यासाठी आ. बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला महामंत्री विजय चौधरी, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राजेंद्र गोंदकर, महिला जिल्हाध्यक्षा कांचन मांढरे, सरचिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष दीपक रोहम आदी उपस्थित होते.
मागील दहा वर्षांच्या कार्यकाळात मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या निर्णयामुळे एक विकसित देशाची प्रतिमा जगात निर्माण झाली आहे. मागील ६५ वर्ष काँग्रेसची आपण पाहिली. परंतु मोदींची यशस्वी कारकीर्द आज संपूर्ण जगात नावलौकीक मिळविणारी ठरल्याचे नमूद करून आत्मनिर्भर भारताची वाटचाल यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाच्या योगदानाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीकडे लक्ष वेधून आ. बावनकुळे म्हणाले की, राज्यात ४५ लोकसभा मतदारसंघात आपल्याला विजय मिळवायचा आहे. यासाठी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिवसातील तीन तास तेरा मिनिटे संघटनेचे काम करा. संपर्क अभियानातून सरकारच्या योजना लोकांपर्यत घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोफत धान्य योजनेची मुदतवाढ २०२९पर्यंत वाढवून प्रधानमंत्र्यांनी देशातील सामान्य माणसाला आधार देण्याचे काम केले. समाजातील सर्व समाजघटकांना योजनारूपी लाभ देण्याचे मोठे काम सुरू आहे. या सर्व योजना समाज माध्यमातून लोकापर्यंत पोहोचविण्याचे काय वाॅरिर्यसने करण्याचे आवाहन त्यांनी केले.