श्रीरामपूर -राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली जबाबदारी घेतली आहे.आपल्या कुठल्याही प्रश्नाबाबत त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. तो प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी माझी असून, माझ्यावर विश्वास ठेवा] असा शब्द आपल्याला दिला असल्याचे मा.आ. भानुदास मुरकुटे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी माजी आमदार मुरकुटे यांनी येथील उत्सव मंगल कार्यालयात लोकसेवा विकास आघाडीचा मेळावा आयोजित केला होती. अध्यक्षस्थानी हिम्मत धुमाळ होते. यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,सुरेश गलांडे, नाना पाटील, रमेश वारुळे, काशिनाथ गोराणे, अॅडवोकेट सुभाष चौधरी, कोंडीराम उंडे, रावसाहेब थोरात, मंजुश्री मुरकुटे, सिद्धार्थ वरकुटे, सुनीता गायकवाड, मयूर पटारे आदी उपस्थित होते. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीचा अहवाल देत लोकसेवा विकास आघाडीच्या बैठकीत महायुतीचे उमेदवार खासदार लोखंडे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्णय घेतला.
मुरकुटे पुढे म्हणाले की,महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या कार्यकाळातील कामकाजाचा आढावा मांडताना त्यांनी सर्वच लोकसभा मतदारसंघात उमेदवारांबद्दल नाराजी असते, मात्र देशात सत्ता कोणाची त्या पक्षाच्या उमेदवारामागे उभे रहावे लागते.आपण आतापर्यंत नेहमीच सत्तेच्या विरोधात गेलेलो आहोत. परंतु आज देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या रूपाने भाजपाची सत्ता येणार आहे.
अनेक पिकांना भाव मिळत नाही. साखर कारखानदारी बाबतीत केंद्र सरकारची धोरणे नक्कीच चुकीची आहेत. परंतु असे असले तरी लोकसभा निवडणुकीत निकाल वेगळा लागू शकतो. लोकसभा निवडणूक बाबतीत आता निर्णय घेऊन विधानसभेच्या वेळी पुढची रणनीती ठरवू. त्यामुळे आपल्या सर्वांच्या भावना समजून घेत महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या मागे लोकसेवा विकास आघाडीची ताकद उभी करू,असेही मुरकुटे म्हणाले.
यावेळी त्यांनी हात उंचावून उपस्थित कार्यकर्त्यांना मत नोंदवायला सांगितले. त्याला उपस्थित आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच कोणाला अन्य उमेदवाराची निवड करायची असेल तर त्यांनीही हात उंच करा, असे आवाहन केले. त्यावेळी काही मोजकेच हात वर झाले होते. यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी हजेरी लावून मेळाव्याला संबोधित केले.
दगडापेक्षा वीट मऊ
महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे व महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या कार्यकाळातील कामकाजाचा आढावा मांडताना मुरकुटे यांनी सर्वच लोकसभा मतदारसंघात उमेदवारांबद्दल नाराजी असते. मात्र ‘दगडा पेक्षा वीट मऊ’ या न्यायाने कुठल्यातरी उमेदवारामागे उभे रहावे लागते, असे म्हणताच बैठकीत एकच हशा पिकला.