मुंबई – महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील रिक्त पदांवर असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर सामावून घेण्याची मागणी करत राज्यातील महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले.
ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर मधील कटोल रोड येथील महावितरण कार्यालयासमोर देखील या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे जवळपास आठ तास काम बंद ठेवत या कर्मचाऱ्यांनी मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली.
राज्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या सरकारी वीज कंपन्यांमध्ये सुमारे ४२ हजार कंत्राटी कामगार हे अनेक वर्षापासून कंत्राटी सेवा देत आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान २८ आणि २९ फेब्रुवारी रोजी राज्यभरात ४८ तास काम बंद केले जाणार आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर आगामी पाच मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा संयुक्त कृती समितीच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.
कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत त्या जागांवर नियमित भरती करू नये. कंत्राटी कामगारांना एकूण पगारात एक एप्रिल पासून ३० टक्के वाढ करण्यात यावी, तसेच मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारसीची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी,
कंत्राटी कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार देण्यात यावा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी कर्मचाऱ्यांना प्रमाणे समान काम समान वेतन देण्यात यावे, अशा विविध मागण्या यावेळी कामगारांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.