मुंबई – राज्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश येत असल्याचे काही वर्षांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. केंद्राच्या वतीने काही संस्थांनी केलेल्या अहवालातून हे चित्र स्पष्ट झाले आहे.
केंद्र शासनाच्या २०१८ च्या एसआरएस अहवालानुसार महाराष्ट्राचा अर्भकमृत्यू दर हा प्रति १००० जन्मामागे १९ असा होता, त्यात घट होऊन सन २०२० च्या एसआरएस अहवालानुसार हा १६ झाला आहे.
तसेच सन २०२० च्या एसआरएस अहवालानुसार राज्याचा नवजात मृत्यू दर हा ११ असून महाराष्ट्राने शाश्वत विकास ध्येयाचे नवजात मृत्यू दर १२ पेक्षा कमी करण्याचे लक्ष्य गाठले आहे.
राज्यातील जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि काही उपजिल्हा रुग्णालयांत एसएनसीयूची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्यात एकूण ५३ एसएनसीयू कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
या ठिकाणी बाळ जन्मल्यानंतर बाळाचे वजन कमी असल्यास, काविळ झाली असल्यास किंवा त्याला इतर कोणताही त्रास असल्यास बाळाला एसएनसीयू कक्षामध्ये दाखल करुन उपचार केले जातात.
एसएनसीयुमध्ये किमान १२ ते १६ खाटा असून हा कक्ष रेडियंट वॉर्मर, फोटोथेरपी युनिट, इन्प्युजन पंप, मॉनिटर्स, नॉन इनवेसिव्ह व्हेंटीलेशन (सीपीएपी) यासारख्या उपकरणांनी सुसज्ज आहे.
राज्यात एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ पर्यंत एकूण ५६४६७ बालकांवर एसएनएसीयुमध्ये उपचार करण्यात आले. त्यामध्ये १५०० ग्रॅम पेक्षा कमी वजनाच्या ५४५९ बालकांचा समावेश आहे.
माँ कार्यक्रमाचा फायदा
स्तनपानाविषयी मातेला, वडिलांना तसेच कुटूंबियांना योग्य माहिती पुरविण्यासाठी तसेच स्तनपान आणि शिशुपोषणास सक्षम असे वातावरण तयार करण्यासाठीचा माँ हा सरकाने चालू केलेला एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे.
या कार्यक्रमा अंतर्गत प्रचार आणि प्रसिध्दी, स्तनदा आणि गरोदर मातांसाठी आशांमार्फत घेण्यात येणाऱ्या माता बैठका, आरोग्य कर्मचाऱ्यांना स्तनपान आणि शिशूपोषणाचे प्रशिक्षण, सनियंत्रण आणि मूल्ययमापन,
सर्व आरोग्य संस्थांचे शिशू मैत्रीकरण यासारखे उपक्रम राबविले जातात. माहे एप्रिल ते डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण १७२९४१ माता बैठका झाल्या असून यामध्ये १३७४५१५ मातांचे समुपदेशन करण्यात आले आहे.